
भरतीत प्रचंड गोंधळ; संतापलेल्या तरुणींचे आंदोलन
मुंबई : मुंबईतील दहिसर येथे अग्निशमन दलाच्या भरतीमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार होत असल्याचे निदर्शनास आल्याने संतापलेल्या तरुणींनी घोषणा देत आंदोलन केले. यावेळी मोठा गोंधळ निर्माण झाल्याने पोलिसांनी २ हजार मुलींवर लाठीचार्ज केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
दहिसर परिसरात सुरु असलेल्या अग्निशमन दलाच्या भरतीवेळी मोठा गोंधळ पाहायला मिळाला. गोपीनाथ मुंडे शक्ती मैदानावर ही भरती प्रक्रिया सुरू आहे. यासाठी राज्यभरातून हजारो महिला उमेदवार भरतीसाठी आल्या आहेत. मात्र, भरतीमध्ये अपात्र ठरवलेल्या महिला उमेदवार संतापल्याने वातावरण शांत करण्यासाठी त्यांच्यावर पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केल्याचे समजते.
हे पण वाचा : पोलीस भरतीसाठी आलेल्या मुलींचं भयानक वास्तव समोर
अग्निशमन दलाच्या भरतीसाठी महाराष्ट्रभरातून महिला उमेदवार आल्या आहेत. यावेळी भरतीसाठी १६२ सेट सेंटिमीटर उंचीची अट ठेवण्यात आली आहे. मात्र, त्यापेक्षा जास्त उंची असल्याचे सांगत अपात्र ठरलेल्या महिला उमेदवारांना आपला राग अनावर झाला आणि त्यांनी मैदानाच्या परिसरातच घोषणाबाजी करण्यास सुरूवात केली.
अग्निशमन दलाने घालून दिलेल्या उंचीच्या नियमापेक्षा अधिक उंची असूनही या तरुणींना डावलण्यात आल्याचे या तरुणींचे म्हणणे आहे.
दरम्यान, शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून या महिला उमेदवारांना पाठिंबा देण्यात आला असून ही भरती प्रक्रिया रद्द केली नाही तर रस्त्यावर उतरण्याचा इशारा देण्यात आला आहे.
भरती प्रक्रियेसाठी राज्यभरातून आलेल्या तरुणींनी या भरती प्रक्रियेवर आरोप केले आहेत. यात भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोपही तरुणींनी केला आहे. गेले २ दिवस आम्ही इथे आलो आहोत. आम्ही शेतकऱ्यांच्या मुली आहोत. आम्हाला उंची असून डावलण्यात येत असल्याचा आरोप मुलींनी केला आहे. तसेच अशाप्रकारे आमच्यावर अन्याय होत असून ही भरती प्रक्रियाच रद्द करावी, अशी मागणी या तरुणींनी केली आहे.