परिषदेच्या निवडणुकीतून ठाकरे गटाला धडा

Share

गेल्या सहा महिन्यांपूर्वी राज्यात सत्तेवर आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करण्याची एकही संधी ठाकरे गटाकडून सोडण्यात आलेली नाही. राज्यपाल कोश्यारी यांच्यानिमित्ताने महापुरुषांचा मुद्दा उचलून धरून पाहिला. तळेगावचा फोक्सान वेदांतचा प्रकल्प गुजरातमध्ये गेला, आता मराठी तरुणांच्या हातात काम कोण देणार असा प्रचार करत ठाकरे गट आणि राज्यातील महाविकास आघाडी सरकारने आरोपांची राळ उठवली. भाजप आणि शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार कसे महाराष्ट्रद्रोही आहे हे जनतेच्या मनात बिंबवण्याचा ऐनकेन प्रकार विरोधी पक्षांकडून केला गेला; परंतु या प्रचाराला महाराष्ट्रातील सुज्ञ नागरिक बळी पडले नाहीत, हे गुरुवारी विधान परिषदेच्या पाच जागांच्या निकालावरून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. या निवडणुकीसाठी राज्यातील पाच मतदारसंघांतील शिक्षक आणि पदवीधरांनी मतदान केले आहे. शिकला तो वाचला असे म्हणतात. त्याप्रमाणे आदर्श पिढी घडविण्याचे काम जे शिक्षक असतात, त्यांनी आपले अमूल्य मत दिले आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील सुजाण पिढीचे प्रतिनिधित्व करणारी पदवीधर मंडळींनी यावेळी मतदानांचा हक्क बजावला. या मतदानांतून मराठी अस्मितेच्या नावाने जनतेला भ्रमिष्ठ करणाऱ्या विरोधकांचा भ्रमाचा भोपळा फुटला आहे. कोकण हा एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो; परंतु कोकण शिक्षक मतदारसंघात भाजपने महाविकास आघाडीला धक्का दिला आहे. भाजपच्या ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी मविआचे उमेदवार आणि विद्यमान आमदार बाळाराम पाटील यांचा २० हजारांहून अधिक मतांनी पराभव केला आहे. खरं तर म्हात्रे हे मूळचे शिवसैनिक. मागील विधान परिषद निवडणूक त्यांनी लढवली होती. शिंदे गट आणि ठाकरे गट हे स्वतंत्र झाल्यानंतर त्यांनी शिंदे गटासोबत राहण्याचा निर्णय घेतला होता.

ही जागा भाजपच्या चिन्हावर लढवावी असा आग्रह भाजप नेतृत्वाकडून धरण्यात आला होता. त्यामुळे म्हात्रे यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवून ती जिंकली. पहिला निकाल जाहीर झाला तो म्हात्रे यांचा. ते जाएंट किलर ठरले आणि महाविकास आघाडी सपशेल अपयशी ठरली. अँटीइंकम्बसीचा फटका बाळाराम पाटलांना बसला. जुन्या पेन्शन योजनेसारखा मोठा मुद्दा भाजपच्या विरोधात असला तरी भाजपने कोकणात विजय खेचून आणला. खरं तर शिक्षक मतदारसंघाची समीकरणे वेगळी असतात. या निवडणुकीत पक्षापेक्षाही उमेदवाराचे संघटनात्मक काम कायमच निर्णायक ठरते हे या विजयाने पुन्हा अधोरेखित केले. म्हात्रे यांनी या मतदारसंघात गेले ६ वर्षं जोरदार मोर्चेबांधणी केली. शिक्षकांची मोठी फौज त्यांनी उभी केली. शिक्षक सेनेच्या माध्यमातून प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मतदारसंघातील तब्बल ३३ संघटनांचा पाठिंबा म्हात्रेंनी मिळवला. याच जोरावर म्हात्रेंचा दमदार विजय झाला. म्हात्रेच्या विजयामुळे ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यातील ठाकरे गटाला आता मोठेपणा करण्याची संधी मिळणार नाही. नाशिक पदवीधर मतदारसंघात अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या शुभांगी पाटील यांना ठाकरे गटाने सुरुवातीला पाठिंबा दिला. महाविकास आघाडीची ताकद पाटील यांच्या मागे उभी करण्याचा प्रयत्न केला; परंतु त्याचा काही फायदा झाला नाही. अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांना पाचव्या फेरीअखेर तब्बल ६८ हजार ९९९ मते मिळाली, तर शुभांगी पाटील यांना ३९ हजार ५३४ मते पडली. तांबे हे तब्बल २९ हजार ४६५ इतक्या मताधिक्क्याने विजयी झाले. महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार असतानाही शुभांगी पाटील यांना मोठा पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रात ठाकरे यांची किती चालते हे या निकालावरून स्पष्ट झाले.

दुसरीकडे या निकालानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी झालेल्या काही चुका सुधारण्यावर भर देत आत्मचिंतन करणार असल्याचे सांगितले आहे. कारण अमरावती पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे- पाटील यांचा विजय झाला आहे. अत्यंत चुरशीच्या झालेल्या लढतीत लिंगाडे यांनी भाजपचे उमेदवार डॉ. रणजित पाटील यांचा पराभव केला आहे. रणजित पाटील यांचा पराभव हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे. स्वच्छ प्रतिमा असलेले ना. गो. गाणार यांचा नागपूरमध्ये झालेला पराभव हाही अनेकांच्या भुवया उंचावणारा होता. औरंगाबाद शिक्षक मतदारसंघातून राष्ट्रवादीचे विक्रम काळे हे चाैथ्यांदा आमदार झाले आहेत. शिंदे गटाचे पाच आमदार या मतदारसंघात असताना, काळे यांना यावेळी पराभव स्वीकारावा लागेल, असे वाटत होते. त्यात राष्ट्रवादीतील फुटीर उमेदवार निवडणूक रिंगणार असतानाही काळे यांचा विजयाचा मार्ग कोणी रोखू शकले नाही. त्यामुळे भाजपकडून आत्मचिंतनाचा दिलेला सल्ला हा पुढील निवडणुकांमध्ये विजय खेचून आणण्यास कारणीभूत ठरेल. या निवडणुकीतून ठाकरे गटाला महाविकास आघाडीच्या छत्राखाली राहून भविष्यात यश मिळेल का? याचा विचार करावा लागणार आहे. कोकणात म्हात्रे यांच्यासारखा जुना शिवसैनिक हा भाजपच्या तिकिटावर विजयी होत असेल, तर आता शिवसैनिकांनाही भाजपशिवाय महाराष्ट्रात पर्याय नाही, असे वाटल्यास आश्चर्य वाटायला नको. मातोश्रीच्या चार भिंतीत बसून राजकारण करणे हे पुढील काळात तितकेसे सोपे राहिलेले नाही, हे ठाकरे गटाला कळून चुकेल.

Recent Posts

चंद्रपूर: येत्या २४ एप्रिल पर्यंत उष्णतेचा ‘येलो अलर्ट’

चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…

16 minutes ago

KKR vs GT, IPL 2025: गुजरातविरुद्ध घरच्या मैदानावर कोलकत्त्याचा लाजिरवाणा पराभव

कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…

7 hours ago

उबाठाला राणेंचा दणका! सिंधुदुर्गात होणार १५०० कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश!

२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…

8 hours ago

ही कणकवली नव्हे, कुडाळ आहे! निलेश राणे यांच्याशी पंगा नको!

माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…

8 hours ago

नाल्यातून गाळ काढताना ३० सेकंदाचा व्हिडीओ कंत्राट कंपनीला बंधनकारक

लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…

9 hours ago

PM Modi : आजची धोरणं, उद्याचं भारत! – पंतप्रधान मोदींचा नागरी सेवकांना मंत्र

PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…

9 hours ago