सत्र आणि उच्च न्यायालयाने दोषी ठरवलेल्या तरूणाची सर्वोच्च न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता
नवी दिल्ली : दोघांच्या सहमतीने ठेवलेले शारीरिक संबंध बलात्कार नाही, असा मोठा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. लग्नाचे आश्वासन देऊन विवाहित महिलेशी शारीरिक संबंध ठेवल्याप्रकरणी दिल्लीतील सत्र न्यायालयाने आणि उच्च न्यायालयाने दोषी ठरवलेल्या एका व्यक्तीची सर्वोच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. दरम्यान, आरोपी व्यक्तीसोबत राहण्यासाठी महिलेने आपला पती आणि तीन मुलांना सोडले होते. तसेच, बलात्काराचा आरोप असलेली व्यक्ती देखील विवाहित होती.
दिल्लीत राहणाऱ्या नईम अहमदला उच्च न्यायालयाने सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. परंतु न्यायमूर्ती अजय रस्तोगी आणि बेला एम त्रिवेदी यांच्या खंडपीठाने बलात्काराच्या आरोपातून त्याची निर्दोष मुक्तता केली. न्यायालयाने नमूद केले की, अनेक कारणांमुळे सहमतीने ठेवलेले शारीरिक संबंध बिघडल्यानंतर सतत महिलांकडून बलात्काराचा आरोप करण्यासाठी याचा वापर करतात.
अहमदने लैंगिक संबंध ठेवण्याच्या हेतूने लग्नाचे वचन दिले होते, असा सत्र न्यायालय आणि उच्च न्यायालयाने निष्कर्ष काढला होता, असे ज्येष्ठ वकील इंदिरा जयसिंह यांनी महिलेची बाजू मांडताना सांगितले. तर दुसरीकडे, अहमदचे वकील राज के चौधरी यांनी सांगितले की, महिलेने मोठ्या रकमेची मागणी पूर्ण न केल्याने बलात्काराची तक्रार दाखल केली होती.
दरम्यान, महिलेचे लग्न झाले असून तिला तीन मुले आहेत. पती आणि मुलांना सोडून ती २००९ मध्ये अहमदसोबत पळून गेली. त्यानंतर २०११ मध्ये एका मुलाचा जन्म झाला. यानंतर अहमदने लग्न टाळले. २०१२ मध्ये महिला अहमदच्या मूळ गावी गेली असता तो विवाहित असून त्याला आधीच मुले असल्याचे आढळून आले. तरीही, महिलेने २०१४ मध्ये आपल्या पतीला घटस्फोट दिला आणि पतीसोबत आपली तीन मुले सोडली. हे सर्व घडल्यानंतरही अहमदने संबंधित महिलेशी लग्न करण्याचे टाळले. त्यामुळे २०१५ मध्ये या महिलेने त्याच्याविरुद्ध बलात्काराची तक्रार दाखल केली होती.