विकासकामांसाठी २७ हजार कोटींची तरतूद
मुंबई : मुंबई महानगरपालिकेचा २०२३-२४ या आर्थिक वर्षाचा ५२,६१९ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी महानगरपालिका आयुक्त प्रशासक इक्बाल सिंह चहल यांना शनिवारी सादर केला. तब्बल ३७ वर्षांनी प्रशासकांच्या माध्यमातून महापालिकेचा अर्थसंकल्प जाहीर झाला आहे. या अर्थसंकल्पात नवीन करवाढीची कोणतीही घोषणा केलेली नाही. मात्र, सध्याच्या महसुली स्रोतांमधून महसूल वाढवणे, महसूल वाढीसाठी नवीन स्रोतांचा शोध घेणे, आणि खर्चावर नियंत्रण ठेवण्यावर अर्थसंकल्पात भर देण्यात आला आहे.

सुमारे ६५.३३ कोटी रुपये शिलकीचा ५२६१९.०७ कोटींच्या या अर्थसंकल्पात चालू विकासकामांना गती देण्याचा प्रयत्न करण्यासाठी भरीव निधीची तरतूद केली आहे. या अर्थसंकल्पात मुंबईच्या विकासासाठी २७ हजार २४७ कोटी ८० लाख रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे.
मुंबई महानगरपालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या सागरी किनारा मार्ग प्रकल्पासाठी ३,५४५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्याचबरोबर, तोट्याच्या गर्तेत अडकलेल्या बेस्ट उपक्रमाला ८०० कोटी रुपये अर्थसहाय्य देण्याचे प्रस्ताविले आहे.

मुंबई महापालिकेत आयुक्त इक्बालसिंह चहल यांची प्रशासकाची नेमणूक झाली आहे. त्यामुळे तब्बल ३७ वर्षांनी प्रशासक म्हणून इक्बाल सिंह चहल यांना प्रशासक म्हणून अर्थसंकल्प सादर करण्याचा मान मिळाला. एप्रिल १९८४ मध्ये द. म. सुखटणकर यांची पहिले प्रशासक म्हणून नेमणूक करण्यात आली होती. तर पुढे १२ नोव्हेंबर १९८४ ते ०९ मे १९८५ या कालावधीत जे. जी. कांगा यांनी प्रशासक म्हणून काम पाहिले होते. त्यामुळे फेब्रुवारी १९८५ मध्ये जे. जी. कांगा यांनी प्रशासक म्हणून अर्थसंकल्प मांडला होता. त्यानंतर तब्बल ३७ वर्षांनी चहल यांनी प्रशासक म्हणून अर्थसंकल्प जाहीर केला.

यामध्ये प्रारंभी अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) अश्विनी भिडे या शिक्षण खात्याचा अर्थसंकल्प प्रशासक चहल यांना सादर केला आणि त्यानंतर अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी महापालिकेचा अर्थसंकल्प प्रशासक चहल यांना सादर केला. अर्थसंकल्पाचे आकारमान मागील वर्षाच्या तुलनेत १४.५२ टक्क्यांनी जास्त आहे. मागील अर्थसंकल्पात ४५९४९.२१ कोटी रुपये होते, तर यावर्षी ५२,६१९.०७ कोटी रुपये एवढे आहे. हा अर्थसंकल्प आनंदमय असल्याचे महापालिका प्रशासकांनी म्हटले आहे.