मालेगाव (प्रतिनिधी ): गिरणा बचाव समितीच्या नावाखाली विद्यमान पालकमंत्र्यांनी नाशिक जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांची फसवणूक केली असून गिरणा मोसम शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज लि. कंपनी स्थापन करून कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप करण्यात आाला आहे. याप्रकरणी पालकमंत्री दादा भुसे यांची चौकशी करून फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन अपर जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
दाभाडी येथील अवसायनात आलेला गिरणा साखर कारखाना वाचवण्याचे नावाखाली गिरणा बचाव समितीच्या माध्यमातून विद्यमान पालकमंत्री भुसे यांनी गिरणा शुगर ॲग्रो ॲण्ड अलाइड इंडस्ट्रीज लि.हि कंपनी स्थापन केली. नाशिक जिल्ह्यातील हजारो शेतकरी बांधवांकडून प्रत्येकी हजार-हजार याप्रमाणे कोट्यावधी रुपये जमा केले. आणि फक्त कंपनीचे ४७ मुख्य भागधारक दाखवुन त्यांचेकडून १६ कोटी २१ लाख ८ हजार ८०० रुपयांचे भागभांडवल गोळा केल्याचे दर्शविले. मात्र पालकमंत्र्यांनी गिरणा सहकारी साखर कारखाना तर वाचवलाच नाही, उलट शेतकरी बांधवांची व मुख्य भागधारकांची कोट्यावधी रुपयांची आर्थिक फसवणुक केली. म्हणून त्यांच्या विरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
येत्या १० दिवसात या प्रकरणाची चौकशी करून पालकमंत्र्यांवर गुन्हा दाखल करावा, फसवणूक झालेल्या शेतकरी बांधवांना आणि कपंनीच्या भागधारकांना त्यांचे पैसे व्याजासकट परत मिळवून द्यावेत. अन्यथा पालकमंत्री भुसे यांच्या निवासस्थानी फसगत झालेल्या शेतकरी बांधवांसह जनआंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देखील यावेळी देण्यात आला आहे.