
मुंबई: देशाच्या प्रजासत्ताक दिनी दिल्लीत कर्तव्यपथावरील पथसंचलनात सहभागी झालेल्या महाराष्ट्राच्या चित्ररथाने देशभरातून दुसऱ्या क्रमांकाचे स्थान पटकावले आहे. तसेच उत्तराखंड राज्याचा पहिला तर उत्तर प्रदेशचा तिसरा क्रमांक आला आहे. “साडेतीन शक्तीपीठे आणि नारीशक्ती” ही संकल्पना चित्ररथावर साकारण्यात आली होती.
या चित्ररथाची संकल्पना सांस्कृतिक कार्य संचालनालयाची होती. ‘शुभ ॲड’ या संस्थेने चित्ररथाला मूर्त स्वरुप देण्याचे काम केले. संगीतकार कौशल इनामदार यांनी चित्ररथात साडेतीन शक्तीपीठांचा महिमा सांगणारे गीत संगीतबद्ध केले. तर प्राची गडकरी यांनी हे गीत लिहिले. ‘व्हिजनरी परफॉर्मिंग कला समूह’, या संस्थेच्या कलाकारांनी या चित्ररथावर नृत्य कला सादर करण्यात आली होती.
महाराष्ट्राने यापूर्वी ४० वेळा राजधानी दिल्लीत मुख्य पथसंचलनात चित्ररथ सादर केलेला आहे. महाराष्ट्राला मोठी धार्मिक परंपरा आहे. कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची तुळजाभवानी, माहूरची रेणुकामाता हे तीन पूर्ण शक्तीपीठे आहेत. तर वणीची सप्तश्रृंगी हे अर्धे शक्तिपीठ आहे. या शक्तीपीठांची प्रतिकृती चित्ररथावर साकारण्यात आली होती. देवींच्या दर्शनातून नारीशक्तीचा जागर करण्या यावा या हेतून हा चित्ररथ साकारण्यात आला होता. कर्तव्यपथावर डौलाने चालणाऱ्या महाराष्ट्राच्या चित्ररथाने समस्त देशवासीयांचे लक्ष वेधुन घेतले होते.
https://twitter.com/dayakamPR/status/1620003958399045633?cxt=HHwWgsDQsYvBtPssAAAA