धानोरा नावाचे एक छोटेसे टुमदार गाव होते. पूर्वीच्या काळात प्रत्येक शेतांमघ्ये आंब्यांची खूप खूप झाडे असायचीत. अशा खूप आंब्यांच्या झाडांच्या समुदायाला आमराई असे म्हणायचे. धानोरा गावाच्या शेतशिवारांमध्येसुद्धा अशा अनेक आमराया होत्या. वसंत ऋतूत आंब्यांच्या झाडांना खूप मोहर यायचा. त्याच्या सुगंधाने पूर्ण आमराई दरवळून जायची. थोड्या दिवसात छोट्या कैऱ्यांनी आंब्यांची झाडे बहरून जायची. हळूहळू त्या कैऱ्या मोठ्या होऊ लागायच्या. त्या मोठ्या होऊन थोड्या थोड्या पक्व होऊ लागल्या म्हणजे त्यांचे पाड बनायचेत. ह्या आंबटचिंबट कैऱ्या व झाडाला पिकलेले रसाळ, गोड-आमखर व हिरवट- पिवळसर पाड खाण्यासाठी, कैऱ्या घरी आणून त्यांचा आंबटगोड चवदार आंबरस करून खाण्यासाठी आंबराईत मुलांच्या दररोज न चुकता चकरा व्हायच्यातच.
सहसा ह्या ऋतूत मुलांच्या परीक्षा संपलेल्या असायच्यात. ते आपापल्या घरून बारीक मिठाच्या पुड्या बांधून घ्यायचे. सोबत एखादा छोटासा चाकू किंवा लहानशी सुरी घ्यायचे नि आंबराईत जायचे. तेथे गेल्यानंतर प्रथम झाडाखाली पडलेले पाड गोळा करायचे. मग दगड मारून काही कच्च्या कैऱ्या पाडायचे. अशा पाडलेल्या कैऱ्या ते कापायचे. त्यांच्या कापांना मीठ लावायचे व मस्तपैकी एकमेकांच्या तोंडांना पाणी सोडीत मिटक्या मारीत खायचे. नंतर मस्तपैकी पिकलेले आमखर-गोड पाड खायचे.
कैऱ्या व पाड खाऊन झाल्यानंतर ज्या आंब्यांच्या झाडांच्या फांद्या जमिनीपासून हात पुरेल किंवा उडी मारून हात पुरेल, अशा उंचीवर आहेत, त्या झाडांवर मुले सूरपारंब्यांचा वा डाबडुबलीचा खेळ खेळायचेत. त्यामुळे मुलं झाडांवर खोडावरून किंवा फांद्यांवरून चढण्यात वा खाली उडी मारण्यात पटाईत बनायचेत. अशा दमदार खेळांमुळे मुलांच्या अंगी धाडसी वृत्ती वाढायची, अंगचा कणखरपणा वाढायचा. असेच एकदा एका खेडेगावातील संकेत हा शाळकरी मुलागा आणि त्याच्या नामू, सदू, जगू, सोमू, विनू इ. मित्रमंडळीने आपला मोर्चा आंबराईकडे वळविला. नेहमीप्रमाणे मीठकैया, पाड ह्यांच्यावर ताव मारून मंडळी डाबुडुबली खेळावयास लागली.
कुणी खोडावरून सरसर आंब्याच्या झाडावर चढायचे, कोणी फांद्यांवरून भराभर चढायचे, तर कोणी धाडधाड खाली उड्या मारायचे. इकडून तिकडे पळायचे. एकमेकांना पकडण्याचा प्रयत्न करायचे. पडायचे, उठायचे. पुन्हा तिकडून इकडे धावायचे, असा त्यांचा खेळ चांगलाच रंगात आला होता.
एका फांदीवरून संकेतने खाली उडी घेतली एवढ्यात त्याला नामूचा आवाज ऐकू आला. अरे संकेत, बघ! किती छान तजेलदार, पिवळाधम्मक, सुंदरसा पाड आहे! संकेतने वर बघितले. नामू एका बारीक डहाळीच्या शेंड्याकडे एक सुरेखसा मोहक शेंद्या पाड तोडण्यासाठी त्याला जाताना दिसला. ती डहाळी खालून किडलेली आहे, हेही चाणाक्ष संकेतच्या शोधक नजरेने पटकन हेरले. तो खालून जोराने ओरडला, ‘नामू थांब, त्या पाडाच्या लोभात पडू नको. ती डहाळी खालून किडलेली आहे. केव्हाही मोडून पडेल.’ पण नामू कसला ऐकतो. तो म्हणाला, ‘काही नाही रे, थोडासा हात लांबवून पटकन काढतो.’ जसा नामू त्या डहाळीवर थोडा पुढे सरकला, तशी ती डहाळी कडकन आवाज करीत तुटली. नामू त्या फांदीसह धाडकन खाली येऊ लागला. तेवढ्यात ती फांदी वरच दुसऱ्या एका फांदीत अडकली आणि नामू खाली पडू लागला. ते बघताक्षणीच झटकन संकेत तिकडे धावला आणि पटकन त्याने आपले दोन्ही हात समोर करून चटकन नामूला झेलले. नामूच्या ओझ्यामुळे दोघेही जमिनीवर कोसळले. पण संकेत आधीच सावध असल्याने त्यांना काही फार मार लागला नाही. दोघेही ताबडतोब उठून बसले. तोपर्यंत सगळ्यांनी धडाधड खाली उड्या मारल्या व त्यांच्याजवळ गोळा झालेत. साऱ्यांनी पाडाच्या लोभात पडणाऱ्या लोभी नामूची चांगलीच खरडपट्टी काढली. अर्थात संकेतच्या चाणाक्षपणाची प्रशंसा झाली. नामूने साऱ्यांची क्षमा मागितली. सर्व खेळ सोडून गावाकडे परतले.
-प्रा. देवबा पाटील
माझे कोकण: संतोष वायंगणकर गरिबी आहे, घरची परिस्थिती नाही यामुळे पुढे शिक्षण घेता येत नाही…
वैशाली शिरोडकर: पहलगाम निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेला काश्मीरचा भाग दहशतीच्या सावटाखालीही फुलतो आहे. गेल्या चार-पाच…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण वरुथिनि एकादशी, शके १९४७. शततारका नक्षत्र. योग ब्रम्हा. चंद्र राशी…
भारताचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी दहशवाद्यांनी निष्पाप पर्यटकांवर हल्ला करून २८ जणांची…
हैदराबाद: इंडियन प्रीमियर लीग २०२५मधील ४१व्या सामन्यात आज २३ एप्रिलला मुंबई इंडियन्स संघाने सनरायजर्स हैदराबादला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली…