Monday, June 30, 2025

उल्हास नदी पात्रातील सांडपाणी निचऱ्याला ग्रामस्थांचा विरोध

उल्हास नदी पात्रातील सांडपाणी निचऱ्याला ग्रामस्थांचा विरोध

कर्जत: उल्हास नदीलगत सुरू असलेल्या लब्धी गार्डन्स या गृह प्रकल्पातून थेट नदीपात्रात होणाऱ्या सांडपाण्याच्या निचऱ्याला तेथील ग्रामस्थांनी तीव्र विरोध केला आहे. ग्रामस्थांनी याठिकाणी भेट देत पाहाणी केली. यावेळी हे सांडपाणी नदीमध्ये जात असल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले.


दरम्यान या प्रकाराबाबत दहवली येथील उल्हास नदी बचाव संघटनेने याबाबत अनेक वेळा तक्रारी केलेल्या आहेत. त्याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानेही प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल दिलेला आहे. आज याबाबत ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत मुद्दा उपस्थित केल्यानंतर, उपस्थित नागरिक, ग्रामपंचायत सदस्य, सरपंच यांनी त्या ठिकाणी भेट देऊन पाहाणी केली. यावेळी सरपंच मेघा अमर मिसाळ, उपसरपंच आदेश एकनाथ धुळे, पंचायत समिती सदस्य अमर मिसाळ, सदस्य नरेश कालेकर, सोनम बंधू गायकवाड, पिंटू भवारे यांच्यासह भास्कर तरे, जनार्दन तरे, ॲड. पंकज तरे, सतीश कालेकर व ग्रामस्थ उपस्थित होते.



कारवाई आणि आंदोलनाचा इशारा


याप्रसंगी बोलताना नवनिर्वाचीत सरपंच मेघा मिसाळ म्हणाल्या की, आज अनेक नागरिकांनी केलेल्या तक्रारीची प्रत्यक्ष पाहणी केली असता एकंदर लब्धी गार्डन्स या गृहप्रकल्प व्यावसायिक येथील नागरिकांच्या आरोग्याशी खेळत असल्याचे लक्षात आले आहे. हा प्रकार अतिशय गंभीर असून याबाबत ग्राम पंचायत जाब विचारणार असल्याचा तसेच पाण्याचा निचरा न थांबल्यास कठोर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. तसेच याबाबत उल्हास नदी बचाव ग्रुपचे प्रमुख केशव तरे यांनीही आंदोलनाचा इशारा दिला आहे.

Comments
Add Comment