‘ठाकरे-आंबेडकर युतीशी महाविकास आघाडीचा काहीही संबंध नाही’
गोंदिया : उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्या युतीशी महाविकास आघाडीचा काहीही संबंध नाही, असे वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केले. मात्र त्यांच्या या वक्तव्यानंतर महाविकास आघाडीतील ठाकरे गटाला चांगलाच धक्का बसला असून शिवसेना ठाकरे गट आणि प्रकाश आंबेडकरांच्या वंचित युतीचा विचका झाल्याची राजकीय गोटात चर्चा सुरू आहे.
नुकतेच प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटासोबत युती केली आहे. दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी पत्रकार परिषद घेत युतीची घोषणा केली होती. त्यामुळे राज्यात पुन्हा शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र आली अशी चर्चा सुरू असतानाच आता नाना पटोले यांनी त्यांच्या युतीशी महाविकास आघाडीचा काहीही संबंध नाही, असे स्पष्ट वक्तव्य केले आहे.
याआधी प्रकाश आंबेडकर म्हणाले होते की, आमचा विरोध केवळ राष्ट्रवादी काँग्रेसला होता. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत आमचे पूर्वी चांगले सख्य होते. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आम्हाला महाविकास आघाडीत घेण्यासाठी विरोध करणार नाही, असा विश्वास वाटतो. मात्र नाना पटोलेंच्या या विधानामुळे आंबेडकर यांना महाविकास आघाडीत स्थान मिळेल का, याबाबत शंका उपस्थित केली जात आहे.