दावोस : जागतिक आर्थिक परिषदेच्या निमित्ताने दावोस येथे दाखल झालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज पहिल्याच दिवशी उद्योगांसमवेत विविध सामंजस्य करार करण्यात आले. यात महाराष्ट्रातील गुंतवणूकीसाठी ८८ हजार ४२० कोटींचे करार करण्यात आले असून यामुळे ५० हजारहून अधिक रोजगार निर्माण होतील.
दावोस येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत विविध उद्योगांशी आज सामंजस्य करार झाले. यात आज पहिल्याच दिवशी सुमारे ८८ हजार ४२० कोटी रुपये गुंतवणूकीचे करार झाले असून, इतर प्रकल्पांबाबत संबंधित उद्योगांशी कराराची प्रक्रीया सुरु आहे. तसेच जपान बँकेसमवेत सुपा औद्योगिक वसाहतीसंदर्भात देखील चर्चा झाली.
अमेरिकेच्या न्यू एरा क्लिनटेक सोल्युशनचा चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथे २० हजार कोटी रुपयांचा कोल गॅसीफिकेशन प्रकल्प (रोजगार १५ हजार), ब्रिटनच्या वरद फेरो अॅलाँईजचा गडचिरोली जिल्ह्यातील चार्मोशी येथे १ हजार ५२० कोटींचा स्टील प्रकल्प (रोजगार २ हजार), इस्त्रायलच्या राजूरी स्टील्स अॅण्ड अलॉईजचा चंद्रपूर जिल्ह्यातील मूल येथे ६०० कोटी रुपयांचा स्टील प्रकल्प (रोजगार १ हजार), पोर्तुगालच्या एलाईट प्लास्ट अॅटो सिस्टीम्सचा पुणे जिल्ह्यातील पिंपरी येथे ४०० कोटी रुपयांचा प्लास्टीक ऑटोमोटीव्हज् प्रकल्प (रोजगार २ हजार) तसेच गोगोरो इंजिनियरींग व बडवे इंजिनियरींगचा २० हजार कोटी रुपये गुंतवणूकीचा अॅटो प्रकल्प (राज्यात विविध ठिकाणी रोजगार ३० हजार) अशा काही करारांवर आज स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
राज्यावर गुंतवणूकदारांचा विश्वास – मुख्यमंत्री
दावोसच्या येथे पहिल्याच दिवशी ८८ हजार ४२० कोटींपेक्षा जास्त गुंतवणूकींचे सामंजस्य करार झाल्यामुळे, महाराष्ट्रावर उद्योग व गुंतवणूकदारांचा विश्वास सिद्ध झाल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे सांगितले.
मुख्यमंत्र्यांचे दावोस येथे आगमन झाल्यानंतर त्यांच्या हस्ते सुसज्ज अशा महाराष्ट्र पॅव्हेलियनचे उद्घाटन करण्यात आले. या पॅव्हेलियनला भेट देऊन महाराष्ट्राविषयी जाणून घेण्यासाठी अनेक प्रतिनिधींनी गर्दी केली आहे.
दावोस येथे आतापर्यंत झालेल्या विविध प्रकल्पांसमवेतच्या सामंजस्य करारांनुसार, पुणे येथे २५० कोटी रुपये खर्चाचा रूखी फुडसचा ग्रीनफिल्ड अन्न प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येणार असून, यामुळे राज्याची अन्नप्रक्रिया क्षमता मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. औरंगाबाद येथे १२ हजार कोटी रुपये गुंतवणूकीचा ग्रीनको नविनीकरण ऊर्जेचा (रिन्युअबेल एनर्जी) प्रकल्प उभारण्यात येणार असून, यामुळे ६ हजार ३०० जणांना रोजगार मिळेल.
महाराष्ट्रातील नागरी पायाभूत सुविधांच्या विकासासाठी बर्कशायर-हाथवे या उद्योगाच्या १६ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणूकीसाठी सामंजस्य करार करण्यात आला असून नागरी विकासाला चालना मिळणार आहे. तर पुण्याजवळ जपानच्या निप्रो कार्पोरेशन या उद्योगाचा १ हजार ६५० कोटी रुपये गुंतवणूकीचा ग्लास ट्यूबिंग प्रकल्प उभारण्यात येत असून यामुळे महाराष्ट्रातील औषध निर्मिती क्षेत्रास चालना मिळणार आहे. यामुळे २ हजार रोजगार निर्मिती होईल.
मुंबई येथे इंडस् कॅपिटल पार्टनर्स यांचा १६ हजार कोटींच्या गुंतवणूकीचा प्रकल्प येणार असून, यामुळे आरोग्य, तंत्रज्ञान, संरक्षण अशा विविध क्षेंत्रांमध्ये उत्कृष्ट दर्जाच्या सेवा देता येऊ शकतील. तसेच बर्कले येथील कॅलिफोर्निया विद्यापीठाबरोबर मुंबई महानगरात स्मार्ट व्हिलेज उभारणीसाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे.
या सामंजस्य करार प्रसंगी उद्योग मंत्री उदय सामंत, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणी, उद्योग प्रधान सचिव डॉ. हर्षदिप कांबळे, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॅा. विपीन शर्मा, टी. कृष्णा, श्रे एरेन, आशीष नवडे, स्टीफन व सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
जपान बँकेसमवेत सुपा औद्योगिक वसाहतीसंदर्भात चर्चा
जपान बँकेचे कार्यकारी व्यवस्थापकीय संचालक शिगेटो हाशियामा यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत महाराष्ट्र दालनात बैठक झाली. जपानी बँकेच्या सहकार्याने देशातील ज्या अकरा औद्योगिक वसाहती उभारण्यात आल्या आहेत त्यात सुपा एमआयडीसी येथे इंडस्ट्रियल पार्कच्या याठिकाणी उत्तम प्रकारे वीज, पाणी आणि कनेक्टिव्हिटी देत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. याठिकाणी उद्योगांना अनुकूल असे वातावरण निर्माण केले असून येथील इंडस्ट्रियल पार्कच्या इकोसिस्टमवर देखील चर्चा झाली.
५० हजार तरुणांना मिळणार रोजगार
स्वित्झर्लंडमधील दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत पहिल्याच दिवशी महाराष्ट्रात ८८ हजार ४२० कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे. यातून राज्यात ५० हजाराहून अधिक रोजगार निर्माण होतील, अशी माहिती राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी सोमवारीच दावोसमध्ये आगमन झाले असून ते महत्वाच्या उद्योगांसमवेत सामंजस्य करार करणार आहेत, असे उदय सामंत यांनी सांगितले.