उपमुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीला यश
मुंबई : महावितरण कंपनीच्या खासगीकरणाच्या विरोधात कर्मचाऱ्यांनी ३ दिवसांचा संप पुकारला होता. तर वीज कर्मचारी संपावर गेल्यास मेस्मा म्हणजे अत्यावश्यक सेवा कायदा लागू करण्याचा इशारा राज्य सरकारने दिला होता. सरकारच्या इशाऱ्यानंतरही संपकरी कर्मचारी ठाम होते.
यानंतर आज दुपारी वीज कर्मचारी आणि उपमुख्यमंत्री व उर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक पार पडली. या बैठकीत वीज कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा निघाला आहे. हा संप मागे घेण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केली.
फडणवीस यांनी महावितरण कंपनीचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्यामध्ये संपावर तोडगा काढण्यासाठी चर्चा केली. त्याबद्दल बोलताना फडणवीस म्हणाले की, राज्य सरकारला महावितरणसह तिन्ही कंपन्यांचे खासगीकरण करायचे नाही. ३२ संघटनांशी सकारात्मक चर्चा झाली आहे. तीन ते चार मुद्यांवर सकारात्मक चर्चा झाली. वीज कंपन्यांमध्ये सरकार ५० हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे, असेही फडणवीस म्हणाले.