मुंबई : ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर होत असून शिंदे-भाजपा की महाविकास आघाडी अशी चर्चा सुरु असतानाच राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही एका ठिकाणी बाजी मारली आहे. तर आश्चर्याची बाब म्हणजे दिल्ली महानगरपालिकेमध्ये अडीच दशकांपासूनची भाजपाची सत्ता खालसा करणाऱ्या अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीने दोन जागा जिंकल्या आहेत.
पालघरमध्ये मनसेने खाते उघडले असून गुंडले ग्रामपंचायतीवर मनसेचा झेंडा फडकला आहे. मनसेचे जयेश आहाडी सरपंचपदी निवड झाली आहे. सातपाटीमध्येही मनसेचे आठ उमेदवार निवडून आले आहेत. या विजयासंदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना राज ठाकरेंनी, “याबद्दल आनंद आहे आणि हा आकडा वाढत जाईल,” असे म्हटले आहे.
उस्मानाबादमधील कावळेवाडी आणि पूर्वी ग्रामपंचायत आपकडे आली आहे. गोपाळवाडी ग्रामपंचायतीत भाजपा विजयी झाली आहे. तर वाखरवाडी आणि गोरेवाडी ग्रामपंचयातीत ठाकरे गटाचा विजय झाला आहे.