नाशिक (प्रतिनिधी) : आधुनिक व प्रगत तंत्रज्ञानावर आधारित प्रायोगिक शेतीमुळे निश्चितच शेतकऱ्यांच्या जीवनात अमुलाग्र बदल घडतोय, असे प्रतिपादन कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी केले आहे.
आज नाशिक येथील डोंगरे वसतीगृह येथे आयोजित कृषी महोत्सवाच्या भेटी दरम्यान ते बोलत होते. यावेळी कृषी विभागाचे विभागीय सहसंचालक मोहन वाघ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेचे (आत्मा) प्रकल्प संचालक राजेंद्र निकम, जिल्हा कृषी अधिकारी रमेश शिंदे, प्रकल्प उपसंचालक वंदना शिंदे, उपविभागीय कृषी अधिकारी गोकुळ वाघ, राकेश वाणी, संजय सुर्यवंशी यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
कृषिमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले, शेतकरी हा आपल्या शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने विविध प्रकारची पिके घेत आहे, नवीन प्रकारचे कृषी वाणांची निर्मिती सुद्धा होत आहे. या आधुनिक शेतीस निश्चितच चालना मिळाली पाहिजे. शेतकऱ्यांच्या शेतमालास योग्य भाव, माल साठवणुकीस शीतगृह, शेतीमालाचे पॅकींग, प्रक्रिया उद्योग, निर्यातीकरण या सर्वच बाबीच्या अभ्यासासाठी समिती गठीत केली असून समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर शासनस्तरावर याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी यावेळी दिली.