
मुंबई : मुंबईत गोवरचा प्रादुर्भाव (Measles Patient) दिवसेंदिवस वाढत असून मुंबईत आतापर्यंत एकूण १० बालकांचा मृत्यू झाला आहे. यापैकी एक मृत्यू हा मुंबईबाहेरील रुग्णाचा आहे. तर अजून एका मृत्यूची निश्चित नोंद झालेली नाही. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आणि राज्य सरकारने तातडीने गोवर संसर्गाची दखल घेतली आहे.
मुंबईत गोवरचा उद्रेक झाल्यानंतर त्याचा प्रादुर्भाव हा लगतच्या ठाणे जिल्ह्यातील भिवंडीत दिसून आला. यानंतर नाशिक जिल्ह्यातील मालेगावमध्ये गोवरचे रुग्ण आढळले. नाशिक शहरातही गोवर संशयित आढळून आले आहेत. यामुळे महाराष्ट्रातील गोवरचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारची आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून काम करत आहेत. तसेच केंद्र सरकार बालकांच्या लसीकरणाची वयोमर्यादा ९ महिन्याऐवजी आता ७ महिने करणार आहे. या पार्श्वभूमीवर आज राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या अध्यक्षतेखाली तातडीची बैठक झाली.
मुंबई, भिवंडी, मालेगाव हे महाराष्ट्रातले तीन हॉटस्पॉट बनले आहेत. मुख्यमंत्र्यांनीही याची तातडीने दखल घेतल रुग्णालयात भेट देऊन माहिती घेतली. आपणही आढावा बैठक घेऊन निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने आजही आढावा बैठक घेतली. सध्या राज्यात ६२ संशयित रुग्ण आहेत. गोवरची साथ नियंत्रणात आहे. गोवर यापुढे भविष्यात उद्भवणारच नाही, याची तयारी सुरू केली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दिली.
दरम्यान, ज्या मुलांचा मृत्यू झाला आहे, त्यांचे लसीकरण झालेले नव्हते, असे मंत्री सावंत यांनी सांगितले. शून्य ते ५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या बालकांमध्ये हा संसर्ग अधिक आहे. आतापर्यंत २० लाख नागरिकांच्या घरापर्यंत आरोग्य यंत्रणा पोहोचली आहे. संशयित रुग्ण शोधून, देखरेख ठेवणे आणि तातडीने उपचार उपलब्ध करण्यात देण्यात येत आहे. यामुळे गोवरची साथ राज्यात नियंत्रणात आणण्यात यश आले आहे. लसीचा पुरवठा प्रचंड आहे, असे मंत्री सावंत यांनी सांगितले.