
मुंबई : समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी सातत्याने केंद्र सरकारवर टीका चालवली होती. आजही सकाळी अबू आझमींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ‘नटवरलाल’ म्हणून उल्लेख केला होता. या पार्श्वभूमीवर आज दुपारच्या सुमारास अबू आझमी यांच्याशी संबंधित मुंबईसह देशभरातील वाराणसी, कानपूर, दिल्ली, कोलकाता आणि लखनौ या सहा शहरांमध्ये तब्बल ३० ठिकाणी प्राप्तीकर विभागाने धाडी (IT raid) टाकल्या आहेत. (Income Tax Department raid on Abu Azmi)
त्यांच्या पत्नी आभा गणेश गुप्ता यांच्या काही मालमत्तांवर प्राप्तीकर विभागाने धाड (IT raid) टाकली आहे. बेहिशेबी मालमत्ता, गुंतवणूक आणि काळा पैसा यासंदर्भात या धाडी प्राप्तीकर विभागाने टाकल्याची माहिती समोर येत आहे. अबू आझमी समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष असताना आभा गुप्ता या पक्षाच्या सचिव होत्या.
या धाडींना आभा गुप्ता आणि अबू आझमी यांच्या कुलाब्यातील कमल मॅन्शनमधील कार्यालयांपासून सुरुवात झाली. वाराणसीमधील विनायक निर्माण लिमिटेड या कंपनीवर प्राप्तीकर विभागानं धाड टाकली आहे. आभा गुप्ता यांनी त्यांची बेहिशेबी मालमत्ता या कंपनीत गुंतवल्याचा प्राप्तीकर विभागाला संशय आहे.