
मेलबर्न (वृत्तसंस्था) : आयसीसीने जाहीर केलेल्या टी-२० (T-20) इलेव्हनमध्ये भारताच्या दोन खेळाडूंना संधी मिळाली आहे. भारताची रन मशीन विराट कोहली आणि धडाकेबाज फलंदाज सूर्यकुमार यादव यांना टीम ऑफ द टूर्नामेंटमध्ये स्थान मिळाले आहे. तर हार्दिक पंड्याला बारावा खेळाडू म्हणून स्थान देण्यात आले आहे. टी-२० विश्वचषक स्पर्धा संपल्यानंतर आयसीसीने प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली आहे.
पाकिस्तानला हरवून विजेतेपद पटकावणाऱ्या इंग्लंड संघातील ४ सदस्यांचा या संघात समावेश करण्यात आला आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील प्रत्येकी दोन खेळाडूंचा समावेश आहे. तसेच झिम्बाब्वे, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडच्या प्रत्येकी एका खेळाडूला या संघात स्थान मिळाले आहे.
इंग्लंडच्या एलेक्स हेल्स आणि जोस बटलर यांना सलामीवीर म्हणून या संघात स्थान मिळाले आहे. भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीला तिसऱ्या क्रमांकावर स्थान देण्यात आले आहे. तर सूर्यकुमारला चौथ्या स्थानावर संधी मिळाली आहे.
या संघात इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू सॅम करन आठव्या क्रमांकावर आहे. यानंतर आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज एनरिक नोर्खिया नवव्या क्रमांकावर आहे. वेगवान गोलंदाज मार्क वूड दहाव्या क्रमांकावर आहे. तर, शाहीन आफ्रिदीला ११व्या क्रमांकावर ठेवण्यात आलंय. संघ इथेच संपला असला तरी हार्दिक पंड्याची १२वा खेळाडू म्हणून निवड करण्यात आली आहे.
न्यूझीलंडचा ग्लेन फिलिप्स पाचव्या क्रमांकावर आहे. झिम्बाब्वेचा सिकंदर रजा आणि पाकिस्तानचा लेगस्पिनर शादाब खान यांची अष्टपैलू खेळाडू म्हणून या संघात निवड करण्यात आली आहे.
टी-२० विश्वचषकातील सर्वोत्तम संघ : एलेक्स हेल्स, जॉस बटलर, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ग्लेन फिलिप्स, सिकंदर रजा, शादाब खान, सॅम करन, एनरिक नॉर्खिया, मार्क वूड, शाहीन शाह आफ्रिदी, हार्दिक पंड्या (१२वा खेळाडू).