
ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर एका महिलेने विनयभंगाचा (Molestation) गुन्हा दाखल केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या सगळ्यामुळे व्यथित झालेल्या आव्हाड यांनी आपल्या आमदारकीचाच राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता ठाण्यातील राजकारण तापण्याची शक्यता आहे.
https://twitter.com/Awhadspeaks/status/1591952797968510976
संबंधित महिला ही भाजपची पदाधिकारी असल्याची माहिती समोर आली आहे. कळवा येथील पूलाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमावेळी हा सारा प्रकार घडला. मात्र, त्यावेळी या प्रकाराची इतकी वाच्यता झाली नाही. संबंधित महिलेने त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीनंतर वेगाने चक्रं फिरली आणि माझ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
Molestation : जितेंद्र आव्हाडांविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल
'पोलिसांनी माझ्याविरुद्ध ७२ तासात दुसरा खोटा गुन्हा दाखल केला आहे. मी या पोलिसी अत्याचाराविरुद्ध लढणार,' असे म्हणत आव्हाड यांनी आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचे ट्विटरवरुन जाहीर केले आहे.
'हर हर महादेव' या मराठी चित्रपटात इतिहासाची तोडमोड केल्याचा दावा करत कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी काही दिवसांपूर्वी ठाण्यात या चित्रपटाचा शो बंद पाडला होता. त्यानंतर त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करत अटकेची कारवाईही करण्यात आली होती. या प्रकरणात त्यांना नुकताच जामीन मिळाला असतानाच आता आणखी एका प्रकरणात जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात कलम ३५४ अंतर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे संतापलेल्या आव्हाड यांनी थेट विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे.
तर विनयभंगाची तक्रार दाखल केलेल्या महिलेने प्रसारमाध्यमांशी संवाद साधत आपली भूमिका मांडली आहे. जे माझ्यासोबत झालंय ते दुसऱ्या महिलेसोबत होऊ नये. हे काय आहे, मध्ये येता म्हणून बाजूला उचलून फेकून देता. जितेंद्र आव्हाड यांनी माझ्याकडे वाट मागायला पाहिजे होती किंवा दुसऱ्या वाटेने जायला हवे होते. पण आपल्या हातात ताकद आहे, त्याचा वापर करू, ही जितेंद्र आव्हाड यांची मानसिकता आहे. त्यांनी माझ्यासोबत केले ते खूप चुकीचे आहे. मी या प्रकाराचा निषेध करते, असे संबंधित महिलेने सांगितले.