राजापूर (वार्ताहर) : ऑक्टोबरमध्ये तालुक्यातील पार पडलेल्या दहा ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर आता पुढील महिन्याच्या १८ डिसेंबर रोजी तालुक्यातील ३१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. या ३१ ग्रामपंचायतींमध्ये तालुक्यातील महत्त्वपूर्ण ग्रामपंचायतींचा सामावेश असून आगामी काळात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या ३१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीला मोठे महत्व प्राप्त झाले आहे.
राजापूर तालुक्यात एकूण १०१ महसुली ग्रामपंचायती असून त्यामध्ये सर्वाधिक ५१ ग्रा. पं. च्या निवडणुका एका टप्प्यात होतात. त्यानंतर ३१ ग्रामपंचायतींचा दुसरा टप्पा असून त्यानुसार ग्रामपंचायत निवडणुका होत आहेत. त्यामध्ये मिठगवाणे, नाणार, परुळे, शिवणेबुद्रुक, तळवडे, नाटे, साखर, वडवली, वाटूळ, डोंगर, कळसवली, साखरीनाटे, झर्ये, उपळे, शेजवली, प्रिंदावन, कोतापूर, देवीहसोळ, जैतापूर, हातिवले, आजिवली, ओझर, कोळवणखडी, जुवाटी, येळवण, पाचल, खरवते, माडबन, विलये, हसोळतर्फे सौंदळ, धाऊलवल्ली अशा ३१ ग्रामपंचायतींचा सामावेश आहे.
यामध्ये एकूण ९६ प्रभागांमधून २४९ ग्रा.पं. सदस्य निवडून द्यावयाचे आहेत. या ३१ ग्रा.पं.मध्ये नाटे, साखरीनाटे, पाचल अशा तीन ग्रा.पं.चे प्रत्येकी अकरा सदस्य, मिठगवाणे, नाणार, तळवडे, साखर, कळसवली, कोतापूर, ओझर, जुवाटी, हसोळतर्फे सौंदळ धाऊलवल्ली अशा दहा ग्रा.पं.चे प्रत्येकी नऊ सदस्य तर परुळे, शिवणेबुद्रुक, वडवली, वाटुळ, डोंगर, झर्ये, उपळे, शेजवली, प्रिंदावन, देवीहसोळ, जैतापूर, हातिवले, आजिवली, कोळवणखडी, येळवण, खरवते, माडबन, विलये अशा अठरा ग्रा.पं.चे प्रत्येकी सात सदस्य आहेत. थेट सरपंच निवड हा निवडणुकीचा केंद्रबिंदू असल्याने या निवडणुकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.