Monday, January 12, 2026

Veg Trend : कच्च्या भाज्या खाणे हानीकारक!

Veg Trend : कच्च्या भाज्या खाणे हानीकारक!

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्या शाकाहारी आहाराचा ट्रेंड वाढत आहे. आरोग्य सुधारण्यासाठी लोक फक्त फळे आणि भाज्यांपासून बनवलेले पदार्थ खातात. जगभरातल्या आरोग्य तज्ज्ञांच्या मते याचे अनेक फायदे आहेत. हा आहार वजन, कोलेस्ट्रॉलची पातळी आणि हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी ओळखला जातो; पण काही लोक कच्च्या भाज्या खातात. कच्च्या भाज्या खाणे आरोग्याच्या दृष्टीने हानीकारक असल्याचे संशोधनातून समोर आले आहे.

काही लोकांचा विश्वास आहे की, फळे आणि भाज्या शिजवल्याने आवश्यक पोषण तत्वे नष्ट होतात. कच्चे अन्न खाल्ल्याने शरीरात ऊर्जा वाढते आणि अनेक आजार दूर होतात किंवा टाळता येतात; परंतु संशोधन सूचित करते की, कच्चा शाकाहारी आहार चांगल्या आहारापेक्षा जास्त नुकसान करू शकतो.

काही भाज्या अशाही आहेत, ज्या शिजवल्यानंतर अधिक पोषक ठरतात. शिजवल्याने काही कच्च्या भाज्यांचे पौष्टिक मूल्य कमी होते. लाल भाजी शिजवल्याने त्यातले थायमिन २२ टक्के कमी होते. हा व्हिटॅमिन बी १ चा एक प्रकार आहे, जो मज्जासंस्था मजबूत ठेवतो; मात्र काही भाज्या अशा आहेत, ज्या शिजवल्याने पोषण तत्वे वाढतात.

पालकाची भाजी शिजवल्याने कॅल्शियम अधिक चांगल्या प्रकारे मिळते. टोमॅटो शिजवल्याने व्हिटॅमिन सी २८ टक्के कमी होऊ शकते; परंतु लाइकोपीनचे प्रमाण ५० टक्क्यांपेक्षा जास्त वाढते. यामुळे कर्करोग आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो.

गाजर, मशरूम, शतावरी, ब्रोकोली आणि फुलकोबीदेखील शिजवणे आवश्यक आहे. कच्च्या शाकाहारी आहाराचे योग्य नियोजन न केल्यास वजन अचानक कमी होऊ शकते, असे संशोधनातून समोर आले आहे.

Comments
Add Comment