अलिबाग (वार्ताहर) : पर्यावरण संतुलन व जैवविविधतेत तलाव, सरोवर व जलाशयांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे त्यांचे जतन करण्यासाठी शासनाने सरोवर संवर्धन अभियान सुरू केले आहे. या अभियानांतर्गत रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्यातील ७६ तलावांमधील गाळ काढणे, सुशोभीकरण करणे, बळकटीकरण किंवा पुर्नजीवित करणे अशी कामे पूर्ण केल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिली.
सरोवर संवर्धन अभियानांतर्गत एक एकर क्षेत्राचे नवीन तलाव निर्मिती करणे, तसेच एक एकर क्षेत्रात अस्तित्त्वात असणार्या तलावातील गाळ काढणे, सुशोभीकरण करणे, बळकटीकरण किंवा पुनर्जीवित करणे यासह तलाव परिसरात वृक्ष लागवड, शौचालय व्यवस्था ही कामे करण्यात आली आहेत. या अभियानांतर्गत जिल्ह्यासाठी ७५ तलावांची कामे हाती घेण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून तालुकास्तरावरुन अस्तित्त्वात असणारे १३३ तलावांची अमृत सरोवर पोर्टलवर नोंद करण्यात आली होती. त्यापैकी ग्रामस्थांच्या सहभागातून ग्रामपंचायत १५ व्या वित्त आयोग माध्यमातून आणि शासनाच्या विविध योजना, तसेच कंपन्यांच्या विकास निधीतून ७६ तलावांची कामे हाती घेण्यात आली होती. यासाठी लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था, महिला बचत गट, नागरिक यांनी तलाव संवर्धन अभियानात आपला सक्रिय सहभाग नोंदविला होता.
या सर्वांच्या सहकार्याने जिल्ह्यातील ७६ तलावांचे संवर्धन करण्यात जिल्हा परिषद प्रशासनाला यश मिळाले. यासर्व कामांचे पूर्णत्वाचे प्रमाणपत्र जिल्हा मृद व जलसंधारण विभागाकडे सादर केले जाणार आहे. रायगड जिल्ह्यातील अमृत सरोवर अभियानांतर्गत रोहा तालुक्यातील १३ तलावांचे संवर्धन करण्यात आले, तर अलिबाग ४, कर्जत १, खालापूर ८, महाड ४, माणगाव ४, म्हसळा ६, मुरुड ६, पनवेल ९, पेण ४, पोलादपूर २, श्रीवर्धन ६, सुधागड ४, तळा १, उरण ४ तलावांचे संवर्धन करण्यात आले आहे.