दिवाळीनंतर घरात जमलेले पाहुणे भाऊबीजेनंतर जरा स्वस्थ झाले होते. गप्पांची फुलझाडे उंच उंच उडत होती. बोलता, बोलता सून म्हणाली, ‘काल काढलेल्या ‘५ बाय ५’ रांगोळीचे सारे श्रेय ‘नीता’चे आहे. एकदम क्लास! हो किनई!’ तिला अडवत माझा सर्जन मुलगा म्हणाला, ‘यू आर राँग, प्रश्नच नाही. नीता एक उत्तम कलाकार आहे. पण जिने त्यात रंग भरले, रंगाची संगती जमविली ती साधनाही तितकीच महत्त्वाची आहे. तिच्यामुळे रांगोळीची नजाकत वाढली. दुधात केशर विरले म्हण!’
‘आजचेच माझे इर्मजन्सी ऑपरेशनचे पाहा ना! पेशंटच्या नातेवाइकांनी मला श्रेय दिले. पण जे श्रेय मला दिले ते तितकेच श्रेय अॅनास्थेटिस्ट डॉक्टरचे पण आहे. तो ऑपरेशनची मुख्य ‘कळ’ आहे. इतकंच कशाला, नर्स, वॉर्डबॉय, मावशी यांचे पण महत्त्व अमान्य करता येणार नाही’…
‘तुमचं चालू दे, मी चहा बनवून आणते’ म्हणून उठून मी किचनमध्ये आले. मनात म्हटले, ‘काय चूक आहे?’ मुलाचे बोलणे.
नाटकांत नटाचे कौतुक आहेच, पण मेकअपमन, दिग्दर्शन, नेपथ्यकार याचंही तितकेच योगदान आहे. कीर्तनकार उत्तमच गातो. कीर्तन करतो. पण तबलजी, टाळवाला, मृदंगवाला नसेल तर कीर्तन उठेल? भाषणात वक्ता महत्त्वाचा, पण स्टेज तयार करणारा, प्रस्तावना, ओळख (जन्मगाव, तारीख नव्हे हं) करून देऊन वातावरणनिर्मिती करणारा नसेल तर कार्यक्रमाची उंची वाढेल का?
या सर्वांवरून आता आठवण होत आहे ती गायक आणि निवेदकाची. गेल्या आठ दिवसांत भरपूर ‘दिवाळी पहाट’, ‘दिवाळी सांज’, ‘गीतगुंजन’, ‘लता अविस्मरणीय’, ‘सुरों की बरसात’ असे अनेक कार्यक्रम आवडीने पाहिले, ऐकले. (कानावरून नाही घालवले.) लक्षात आले की गायक-वादक, निवेदक या तीनही लोकांचे घट्ट बंधन असते. जसं निरागस सुरांचे आपसात असते. काही ठिकाणी गाण्यामागून गाणी, गाण्यातून गाणी पाठोपाठ ऐकायला खूप बोअर झाली. दोन गाण्यात जोडली जाणारी कडी म्हणून निवेदक काम करत असतो. तोच नसेल तर किंवा तो नुसताच स्टेजवर मख्ख बसून राहिला तर! किंवा निवेदक नुसताच बोलत राहिला तर! गायकाला संधीच दिली नाही तर! तिन्हीही चूकच!
वक्ता, निवेदक, मुलाखतकार या तिघांचा पाया एकच! उत्तम बोलणे वक्त्याची, गायकाची नीट योग्य शब्दांत अोळख करून देणे. गायक गाणे गाताना, निवेदकाचे काम गाण्यासाठी कॅनव्हास तयार करून देण्याचे असते. चौकट, बॉर्डर तयार करून देण्याचे असते. गाण्याच्या थीमवर फोकस करून श्रोते कसे गुंग होतील याची भूमिका तयार करण्याचे असते. पण त्याला ती संधीच दिली गेली नाही तर!
आपण कितीही मोठे असलो तरी सूत्रसंचालकाने गायकाला, वक्त्यांना मोठे करायचे असते. थिएटरला जास्त पैशाचे तिकीट काढले म्हणजे मराठी माणसाचा दर्जा वाढत असेल कदाचित. पण कलाकाराचे काय? यात निवेदक, गायक, साथीदार सर्व आलेच. निवेदकाजवळ शब्दांचे रांजण भरलेत. श्रोत्यांना शब्दांची तहान आहे. पण तहानलेल्यांना पाणी प्यायची संधी तरी मिळायला हवी ना! प्रकाशाचे एक रूप म्हणजे पणती, ज्योती. काही कार्यक्रमात आढळले की, गाण्यांच्या क्रमाची यादीच व्यवस्थित नव्हती. ती निवेदकाला आधी व्यवस्थित मिळायला हवी. कारण निवेदक Filler नव्हे. तो गद्यातील तबलजी आहे. निवेदकाजवळ अॅक्सिलेटर होता. रंगमंचावरील माणसांना हे कळूनही समजले नाही तर काय करणार? शब्दांचा सेतू मायेच्या धाग्यांनी दोन गाण्यांत कलाकाराचे कौतुक करत करत निवेदकाला खुसखुशीतपणे बांधायचा असतो. गाण्यात गायकाचे पंचप्राण असतात. शब्द, तार, लय, सूर आणि धून. कारण तो देवाकडे मागतो. ज्यातून ७ सुरांची निर्मिती झाली. तसेच निवेदकही मागत असतो की, मी फूल नव्हे तर मी दोरा आहे, हे माहीत आहे. पण कार्यक्रम रंजक करण्याची, पुढे नेण्याची ताकद दे. शब्दांची श्रीमंती दे, पण ती संधीच दिली जात नाही आणि ही गोष्ट प्रेक्षकांच्या लक्षात येते, तेव्हा फार मोठी पंचाईत होते. गाण्यात एक प्रकारचा चढता क्रम राहत नाही, तेव्हा श्रोतावर्गही काही बोलत नाही. आपसात चर्चा करतो. श्रोत्यांना कार्यक्रमांत गाणी पाठोपाठ किती झाली, याची क्वॉलिटी किती? ते नको असते तर क्वॉलिटीचे सादरीकरण हवे असते. कलाकार, गायक, कीर्तनकार, निवेदक, अभिनेता यांना कोणत्याही ‘ईझम’च्या कुंपनात अडकू नये, असे वाटते.
गायक अप्रतिम राग गाण्यात गुंग असताना कुणी आले म्हणून गाणे थांबवणे, जितके चुकीचे, तितकेच श्रोत्यांना फारशी ज्ञात नसलेली माहिती निवेदक सांगत असताना मध्येच नकळत तोडणे तितकेच चुकीचे…. मग त्यांचाही बोलण्याचा सूर निरागस राहत नाही, असा विचार सुरू असताना दूध ऊतू गेले. मी भानावर आले. चहा गाळून ट्रेमधून घेऊन आले आणि सुनेचेच शब्द कानावर आले.
‘एकूणच काय? कोणत्याही क्षेत्रात उत्तुंग शिखरावर जाताना प्रत्येकाची साथ महत्त्वाची. जशी सर्जनला अॅनास्थेटिस्टची तशी गायकाला निवेदकाची, नृत्याला तबल्याची, हे खरंय.
-माधवी घारपुरे







