
मुंबई (किशोर गावडे) : दहीहंडी उत्सवात अपघाती मृत्यू झालेल्या भांडुप पश्चिम येथील तरुणाच्या वडिलांच्या नावे मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून दहा लाख रुपयांची मदत करण्यात आली.
राज्य सरकारने गोविंदा उत्सवात अपघाती मृत्यू आलेल्या गोविंदाला दहा लाखांचे विमा संरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार राज्य सरकारच्या वतीने मुलुंड कुर्ला तहसीलदार डॉक्टर संदीप थोरात यांच्या हस्ते मदतनिधीचा धनादेश वडिल तुकाराम परब यांना देण्यात आला.
दत्तप्रसाद चाळ, कोंढाळकर कंपाऊंड, रामनगर भांडुप पश्चिम येथील प्रथमेश तुकाराम परब वय (२६) हा तरुण गोपाळकाला उत्सवात १६ ऑगस्ट २०२२ रोजी रात्री अकराच्या सुमारास नरदास नगर येथील प्रगती विद्यामंदिरच्या पटांगणावर श्री साई स्पोर्ट्स क्लबच्या वतीने आयोजित गोविंदा पथकाचा सराव सुरू असताना तो जखमी झाला होता. त्यानंतर उपचार चालू असताना ११ सप्टेंबर २०२२ रोजी प्रथमेशचा दुर्दैवी मृत्यू झाला.
या मृत तरुणाच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत मिळावी यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक महेश जयप्रकाश तावडे, प्रशिक्षक शैलेश जागडे, दहीहंडी समन्वय समितीचे अध्यक्ष बाळकृष्ण पडेलकर, सचिव गीता तळावडेकर झगडे, तहसीलदार डॉक्टर संदीप थोरात, तलाठी अमित पाटील आणि श्री साई स्पोर्ट्सने सातत्याने प्रयत्न केले.