नवी दिल्ली (प्रतिनिधी) : सुप्रीम कोर्टाने बलात्कार तसेच लैंगिक शोषणाच्या प्रकरणांमध्ये करण्यात येणाऱ्या कौमार्य चाचणीवर (टू फिंगर टेस्ट) बंदी घातली आहे. तसेच अशा प्रकारची चाचणी करणाऱ्यांना गैरवर्तनाच्या आरोपाखाली दोषी ठरवले जाईल असे स्पष्ट केले आहे.
आजही आपल्याकडे कौमार्य चाचणी घेतली जाते हे निंदनीय आहे अशी खंतही कोर्टाने व्यक्त केली. न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड आणि हिमा कोहली यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली. बलात्कार प्रकरणी शिक्षा सुनावताना त्यांनी ही टिप्पणी केली.
“या न्यायालयाने वारंवार बलात्कार आणि लैंगिक शोषण प्रकरणात कौमार्य चाचणी करण्यास नकार दिला आहे. या चाचणीला कोणताही आधार नाही. याउलट पीडित महिलेवर पुन्हा अत्याचार कऱण्यासारखे असून, तिला अजून एक मानसिक धक्का देण्यासारखे आहे. ही चाचणी घेतली जाऊ नये. लैंगिकदृष्ट्या सक्रीय स्त्रियांवर बलात्कार केला जाऊ शकत नाही या चुकीच्या आधारावर ही चाचणी केली जात आहे. पण सत्यापेक्षा मोठे काही नाही,” असे निरीक्षण खंडपीठाने नोंदवले.