विरार (प्रतिनिधी) : पोर्तुगीजांच्या जुलमी सत्तेतून वसईला मुक्त करणाऱ्या मराठ्यांच्या शोर्याला उजाळा देण्यासाठी आमची वसईकडून दिवाळीमध्ये यंदा वसईचा किल्ला रोशनाईने उजळविण्यात आला. ७१०० दिव्यांनी सदर किल्ला उजळून निघाला आहे.
हतबल वसईकर बांधवांच्या घरी दिवाळी- दसरा साजरी व्हावा म्हणून मराठ्यांनी स्वतःच्या कुटुंबाचा व जीवाचा त्याग केला. दिवाळीत एकीकडे संपूर्ण वसई – विरार शहर, घरे, दुकाने, मंदिर, चर्च, मॉल्स, रस्ते प्रकाशमान होऊन झगमगत असतात. तर दुसरीकडे पराक्रमी मराठा सैन्याच्या शौर्याचा व बलिदानाचा साक्षीदार असलेला वसईचा किल्ला मात्र अंधारात असतो. त्यामुळे आमची वसईकडून येथील किल्ल्यावरील नागेश महातीर्थावर व श्री नागेश्वर मंदिर परिसरात दीपावली साजरी करण्यात येते.
मराठा सैन्यामुळे व भारतीय जवानांमुळे आपण दिवाळी आनंदात साजरी करीत आहोत. त्या पराक्रमी सैन्यास मानवंदना अर्पण करण्यासाठी टीम “आमची वसई” ने दरवर्षी प्रमाणे वसई किल्ल्यात दीपोत्सव साजरी करण्याचे ठरविले. त्यानूसार दीपोत्सवात पणत्या प्रज्वलित करून व रंगबेरंगी रांगोळ्या काढून नरवीर चिमाजी आप्पा स्मारक उजळवण्यात आले.
किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ, तटबंदीवर, सागरी दरवाजाजवळ व नागेश महातिर्थावरही पणत्या व तोरण लावून रांगोळी काढण्यात आली. भव्य आकाश कंदील उजळवण्यात आला. मशालींच्या दिमाखदार उजेडात, वाद्यांच्या गजरात व जय वज्राई-जय चिमाजीच्या जयघोषात अवघे वातावरण मंत्रमुग्ध झाले होते. धर्मसभा अध्यक्ष वेदमूर्ती धनंजयशास्त्री वैद्य यांनी मंत्रोच्चारात दीपप्रज्वलन केले व मोहिमेस आशिर्वाद दिला. दीपोत्सवास पालघर जिल्ह्यातील अनेक मान्यवर, धर्मीक व सामाजिक सज्जन, लोकसेवक, पत्रकार कर्तव्य भावनेने उपस्थित होते.
सर्वजातीय-सर्वधर्मीय वसईकर जुलमी पोर्तुगीजांच्या जाचातून मुक्त व्हावे – स्वतंत्र व्हावे, सक्तीचा कर- सक्तीचे धर्मांतरण थांबावे व जमिनी मालमत्ता तसेच जीव सुरक्षित राहावे, यासाठी हतबल झालेल्या वसईकरांची कळकळीची विनवणी ऐकून पुणे-कोकण-मावळ- इंदोर -सांगली- सातारा इत्यादी ठिकाणहून भव्य मराठा सैन्य अनेक नदी-डोंगर-दऱ्या- खाड्या पार करत करत उत्तर कोकणात दाखल झाले.
महाभारताप्रमाणे युद्ध झाले ! मोहिमेत २५००० घोडदळ, ४०००० पायदळ, ४००० सुरुंग तज्ञ, ५००० उंट, ५० हत्ती व अनेक पिंडारी समर्पित होते. वसईकरांकडून १ नवा पैसा ही न घेता पेशव्यांनी स्वतः कर्ज काढून ३ वर्षे वसई लढवली. दीन व हतबल झालेल्या वसईकरांना सुखी-समृद्ध करण्यासाठी वसई बाहेरील २१,००० मराठ्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली.