Sunday, March 23, 2025
Homeमहाराष्ट्रकोकणउद्धव ठाकरेंचे राजकारण ‘मातोश्री’पुरतेच...

उद्धव ठाकरेंचे राजकारण ‘मातोश्री’पुरतेच…

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा घणाघात

पुणे (प्रतिनिधी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केंद्र सरकारच्या १० लाख पदांच्या भरतीसाठी रोजगार मेळाव्याचा पुण्यातही शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमास केंद्रीय मंत्री नारायण राणे हे दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर नारायण राणे यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला.

यावेळी उद्धव ठाकरे गटाला मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शह देण्यासाठी भाजपची रणनीती काय असणार आहे? असा सवाल पत्रकारांनी त्यांना विचारला असता, ‘उद्धव ठाकरेंचा गट आणि शिवसेना कुठे राहिली आहे. ५६ आमदारांमधील ५ ते ६ आमदार शिवसेनेकडे राहिले आहेत. तेसुद्धा लवकरच शिंदे गटात प्रवेश करतील. ठाकरे सोडून महाराष्ट्र आणि देशात बरेच काही आहे. त्यांचे राजकारण ‘मातोश्री’पुरते उरले आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या काळात ते माझे सहकारी होते. तेव्हा ते असे नव्हते,’ अशा शब्दांत नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र डागले आहे.

पंतप्रधान मोदी हे तरुण-तरुणींना नोकऱ्या उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्रयत्न करत आहेत आणि त्यातील १० लाख नोकऱ्यांचा पहिला टप्पा पार केला आहे, असे नारायण राणे यांनी सांगितले. या तरुण-तरुणींना शासनाच्या विविध विभागात नोकऱ्या देण्यात आल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ७५ हजार तरुणांना नोकऱ्या देऊन चांगले काम केले आहे. ज्यांना नोकऱ्या मिळाल्या आहेत, त्यांना आनंद झाला आहे. यावरून कोणी राजकारण करत असेल, तर दिवाळीनिमित्त मी काही बोलणार नाही, असेही नारायण राणे यांनी
स्पष्ट केले.

आणखी ४ आमदार संपर्कात…

शिवसेनेतील फुटीनंतर ५५ पैकी तब्बल ४० आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणे पसंत केले, तर १५ आमदार उद्धव ठाकरेंच्या पाठीशी उभे राहिले. मात्र या १५ पैकी बहुतांश आमदार एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात जाण्यास उत्सुक असून चार आमदार माझ्या संपर्कात आहेत, असा दावा नारायण राणे यांनी केला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -