मुंबई : राज्य सरकारने कर्मचाऱ्यांसाठी बुधवारी दिवाळीपूर्वीच २१ तारखेला सर्व कर्मचाऱ्यांचे पगार देण्याचा निर्णय घेतला. यामुळे दिलासा मिळालेला असतानाच आता राज्य सरकार सोमवार ते शुक्रवार असे ठरवण्यात आलेले कामाचे दिवस यापुढे शनिवारपर्यंत वाढवण्याच्या तयारीत आहे. गुरुवारी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत यावर निर्णय होण्याचे संकेत आहेत. यामुळे पूर्वीच्या धर्तीवरच दर महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या शनिवारी मंत्रालयासह सर्व प्रशासकीय कार्यालये सुरू राहणार असून, दुसऱ्या व चौथ्या शनिवारी कार्यालयांना सुटी राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. सरकारी कर्मचाऱ्यांची कामाची गुणवत्ता आणि खर्चसुधार धोरणानुसार पाच दिवसांचा आठवडा सुरू करण्यात आला होता. पण, आता हा पाच दिवसांचा आठवडा रद्द होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
केंद्राप्रमाणे राज्य शासकीय कार्यालयांनाही कामकाजाचा पाच दिवसांचा आठवडा करावा, ही गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली मागणी तत्कालिन महाविकास आघाडी सरकारने मान्य केली होती. यानुसार, शनिवार व रविवार असे दोन दिवस आठवडी सुटी आहे. परंतु, कर्मचारी शुक्रवारपासूनच कार्यालयातून गायब असल्याच्या अनेक तक्रारी सर्वसामान्यांमधून करण्यात येत होत्या. तसेच, त्यांच्या कार्यपध्दतीवरही परिणाम होत असल्याचे सांगण्यात येत होते. या पार्श्वभूमीवर शिंदे सरकार ५ दिवसांचा आठवडा रद्द करण्याची शक्यता आहे. या दिशेने पावले उचलण्यास सुरुवात केल्याची माहितीही मिळत आहे.