माणगाव (वार्ताहर) : रायगड जिल्ह्यात माणगांव तालुक्यात परतीच्या पावसाने मोठा धुमाकूळ घातला असून आँक्टोबर महिन्यात देखील पाऊस विजाच्या कडकडाट करून लागत असल्यामुळे बळीराजाच्या भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. वर्षभर केलेली शेतकऱ्यांची मेहनत ही मातीमोल होऊन वाया गेली आहे. परतीचा पाऊस त्यामध्ये सोसाट्याचा वादळ, हवेने शेतामधील भात रोपे ही पाण्यात पडली असून त्यांना अंकुर आले आहेत.
शेतकऱ्यांच्या हातातोंडांशी आलेला घास परतीच्या पावसाने हिरावून घेतला आहे हाती आलेले पीक या मान्सूनमूळे वाया गेली आहेत. रायगड जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांचा शेती हा प्रमुख व्यवसाय आहे. ऑक्टोबर महिन्यात भात कापणीला शेतकरी सुरुवात करतात. संपूर्ण राज्यात पावसाने हाहाकार घातला असून, काही भातशेतीत पावसाचे पाणी पूर्ण पणे भरल्याने ती शेती कापण्याच्या लायक देखील राहिली नाही.
माणगांव तालुक्यात मोठ्या प्रमाणात काही शेतकरी बांधव आपली वडिलोपार्जित शेत जमिनी करत असून ते भातपिकांसाठी वर्षे भर मेहनत करत असतात आपण पिकवलेल्या भातशेती मधून जो सुका पेंडा निघतो तो आपल्या गुरासाठी वर्षभर जपून ठेवत असतात. या वर्षी पावसाने शेतीचे मोठ नुकसान केल्याने गुरांसाठी सुका पेंडा देखील मिळणे महाकठिण झाले आहे. रायगड जिल्ह्यात माणगांव तालुक्यात परतीच्या पावसाने बळीराजाच्या भात पिकांचे मोठे नुकसान केले असून शासनाने रायगड जिल्ह्यात माणगांव तालुक्यात तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करून नुकसान भरपाई द्यावी असे शेतकरी बळीराजा बोलताना दिसत आहे.