ठाणे (प्रतिनिधी) : दीपावलीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी दर वर्षीप्रमाणे याही वर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणेकर नागरिकांसाठी “स्वरदीपावली” हा संगीतमय कार्यक्रम २२ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास मुख्यमंत्री ठाणेकरांच्या भेटीस आवर्जून उपस्थित राहणार असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश समन्वयक तथा बाळासाहेबांच्या शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी दिली.
दर वर्षी ठाणेकरांसाठी दीपावलीनिमित्त संगीतमय कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. यंदाची दिवाळी ही ठाणेकरांसाठी विशेष आनंददायी आहे कारण, ठाण्याचे एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदी विराजमान होताच त्यांनी दहीहंडी, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव हे सर्वच सण जल्लोषात साजरा करण्याची संधी संपूर्ण महाराष्ट्राला दिली. दिवाळीसुद्धा सर्वत्र उत्साहात साजरी होणार आहे. याचाच एक भाग म्हणून ठाण्यातील कोपरी येथील अष्टविनायक चौक येथे शनिवार दि. २२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता स्वरदीपावली हा संगीतमय कार्यक्रम ठाणेकरांसाठी आयोजित केला आहे.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गिरीश राजे, प्रकाश कोटवानी, माजी नगरसेविका मालती पाटील, नम्रता पमनानी, शर्मिला पिंपळोलकर-गायकवाड, प्रमोद बनसोडे, सर्व शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख विशेष मेहनत घेत आहेत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून रसिक प्रेक्षकांना नवीन व जुन्या मराठी गाण्यांचा आस्वाद घेता येणार आहे. हा स्वरदीपावली कार्यकम बहारदार करण्यासाठी अभिनेते अंशुमन विचारे, मानसी नाईक, जुईली जोगळेकर, राहुल सक्सेना, कविता राम, प्रसेनजीत कोसंबी, अक्षता सावंत, जगदीश पाटील, तेजा देवकर, सुकन्या काळण, हेमलता बाणे आदी नामवंत गायक-अभिनेते सहभागी होणार आहेत.
दीपावली म्हणजे उत्सव दिव्यांचा, मांगल्याचा, मनामनातील अंधार दूर करून नव्या उमेदीने उभे राहण्याच्या या सणांचा द्विगुणित करण्यासाठी सर्व ठाणेकरांनी या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहन शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केले आहे.