नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आगामी आशिया चषक २०२३ स्पर्धा पाकिस्तानात होणार असल्याचे समोर आले आहे. या स्पर्धेकरिता भारतीय संघ पाकिस्तानला जाणार नाही, अशी घोषणा बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी केली आहे. ही स्पर्धा दुसऱ्या कोणत्यातरी ठिकाणी घ्यावी अशी मागणीही शहा यांनी केली. बीसीसीआयची सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली, यावेळी शाह यांनी ही घोषणा केली.
दहशतवादाच्या मुद्द्यावर भारतीय संघ शेजारील पाकिस्तानचा दौरा करत नाही. २००५-०६ नंतर एकदाही भारतीय संघ पाकिस्तानात सामना खेळण्यासाठी गेलेला नाही. दरम्यान बीसीसीआयचे ३६वे अध्यक्ष माजी क्रिकेटपटू रॉजर बिन्नी झाले असून या निर्णयासाठी बीसीसीआयची ९१वी सर्वसाधारण सभा पार पडली. यावेळी इतरही विषयांवर चर्चा झाली असून बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी आगामी आशिया कप २०२३ बद्दल बोलताना भारतीय संघ पाकिस्तानला स्पर्धा खेळण्यासाठी जाणार नाही असे स्पष्ट वक्तव्य केले. तसेच स्पर्धा पाकिस्तानशिवाय इतर कोणत्यातरी ठिकाणी घ्यावी अशी मागणीही त्यांनी केली. आशिया कपमधील संघाचा विचार करता युएईमध्ये ही स्पर्धा घेतली जाऊ शकते.
भारत आणि पाकिस्तान देशांतील संबंध चांगले नसल्याने दोन्ही देशांचे संघ एकमेंकाचा दौरा करत नाहीत. भारताचा विचार करता भारतीय संघाने राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली २००५-०६मध्ये अखेरचा पाकिस्तान दौरा केला होता. २०१२-१३ मध्ये पाकिस्तान भारताच्या दौऱ्यावर आला होता, त्यानंतर जवळपास १० वर्षे झाल्यानंतरही दोन्ही संघ एकमेंकाच्या भूमीवर क्रिकेट खेळलेले नाहीत. केवळ आयसीसी स्पर्धा आणि आशिया चषक स्पर्धेतच दोघेही एकमेंकाविरुद्ध आमने-सामने येतात. आता भारत-पाकिस्तान २३ ऑक्टोबर रोजी टी-२० विश्वचषक स्पर्धेमध्ये आमनेसामने येणार आहेत.