Thursday, May 15, 2025

महामुंबईताज्या घडामोडी

मुंबईसह राज्याला परतीच्या पावसाने झोडपले

मुंबईसह राज्याला परतीच्या पावसाने झोडपले

मुंबई : मुंबई, पुण्यासह राज्यभर परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. राज्यातील अनेक शहरातील रस्ते पाण्याखाली गेले आहेत. मुंबई आणि पुण्यात सायंकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. तर गाव खेड्यातही मुसळधार पाऊस कोसळला. नदी आणि नाले तुडुंब भरुन वाहत आहेत. तर काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. राज्यातील अनेक धरणे भरली आहेत. परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पिकं पाण्याखाली गेल्यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा एकदा नुकसानीचा सामना करावा लागत आहे.


मुंबईला परतीच्या पावसाने झोडपून काढले. सायंकाळी तासभर मुंबईत मुसळधार पाऊस कोसळला. यामुळे मुंबईचे दृश्यमान कमी झाले. तर काही भागात पाणी भरले. दुसरीकडे पुणे शहरातही मुसळधार पाऊस पडला. पुण्यातील कोथरुड, स्वारगेट, हडपसर, शिवाजीनगर या भागात पावसाने चांगलेच झोडपले. या पावसामुळे वाहतुकीवर परिणाम झाला.


कोकणातही गडगडाटासह मुसळधार परतीचा पाऊस कोसळत आहे. कणकवली साळीस्ते येथील घरावर वीज कोसळल्याची घटना घडली. या घटनेत पांडुरंग नारायण गुरव यांचा मृत्यू झाला. अचानक आलेल्या पावसामुळे वाहनचालकांची तारांबळ उडाली, जुना पुणे- मुंबई महामार्गावर पावसामुळे काही अंतरावरील वाहन दिसत नव्हती, आज दुपारी अचानक ढग दाटून आले आणि मुसळधार पाऊस कोसळायला सुरुवात झाली, पुण्याच्या मावळ, पिंपरी-चिंचवड परिसरात जोरदार पाऊस झाला.


दरम्यान, १ ऑक्टोबर ते १२ ऑक्टोबर परतीच्या पावसाने झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले आहेत. पंचनामे यांचा अहवाल आल्यानंतर या शेतकऱ्यांना देखील मदत केली जाईल. वेळ प्रसंगी केंद्राची मदत घेऊ, शेतकऱ्यांनी घाबरू नये, परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानांची सरकार भरपाई करून देईल, असे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले.

Comments
Add Comment