मुंबई : अंधेरी पोटनिवडणुकीत ऋतुजा लटके यांना राजीनाम्याच्या जंजाळात अडकवून विश्वनाथ महाडेश्वरांना उमेदवारी देण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे.
लटकेंच्या उमेदवारीवरून काल रात्री उशिरापर्यंत मातोश्रीवर खलबते झाल्याचे समजते. या बैठकीला स्वत: लटके उपस्थित नव्हत्या. मात्र, ठाकरे गटाकडून लटके यांचा राजीनामा मंजूर झाला नाही, तर मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर, प्रमोद सावंत आणि कमलेश राय यांच्याही नावाची चर्चा झाल्याचे समजते. तर भाजपने मुरजी पटेल यांना रिंगणात उतरवण्याची तयारी केली आहे.
https://twitter.com/ManojBChavan5/status/1580316534030770176महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे अध्यक्ष मनोज चव्हाण यांनी याबाबत एक ट्विट करून अंधेरी पोटनिवडणुकीत नवा ट्विस्ट निर्माण केला आहे. त्या ट्विटमध्ये चव्हाण म्हणतात की, मुळात लटकेताईंना राजीनाम्याच्या जंजाळात अडकऊन अंधेरीची उमेदवारी विश्वनाथ महाडेश्वर यांना देण्याचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे अनिल परब यांचा डाव आहे. लटके वहिनींनी तो ओळखावा इतकच..., असे आवाहन त्यांनी आपल्या ट्विटमधून केले आहे.
अंधेरी पूर्वचे आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे ही निवडणूक होत आहे. त्यासाठी निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार उद्या १४ ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. ३ नोव्हेंबरला मतदान तर ६ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.






