ओरोस (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मुख्य पीक भात असून, खरीप हंगामात ६० हजार ९९० हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात येते. हळवे भात तयार झाले असून, पावसाची उघडीप पाहून शेतकऱ्यांनी भात कापणीस प्रारंभ केला आहे. लवकरच भात विक्री केंद्रावर विक्री प्रक्रिया सुरू होणार असून, तत्पूर्वी विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना नावनोंदणी करावी लागणार आहे. १५ ऑक्टोबरपर्यंत नावनोंदणीची मुदत देण्यात आली आहे.
मार्केटिंग फेडरेशनतर्फे भात खरेदी व्यवस्था शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात येते. गतवर्षी क्विंटलला १८६८ रुपये दर देण्यात आला होता. तसेच ७०० रुपये बोनस देण्यात आला होता. तर यावर्षीचा २ हजार ४० रुपये एवढा दर जाहीर झाला आहे. जिल्ह्यात भाताचे उत्पन्न सर्वाधिक शेतकरी घेत असल्याने गरजेपुरता भात ठेवून उर्वरित भात शेतकरी विकतात. त्यामुळे भात विक्रीतून शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्न मिळते. भात कापणी सुरू झाल्याने डिसेंबरपासून २८ केंद्रावर भात खरेदी सुरू होणार आहेत. जे शेतकरी भात विकणार आहेत, त्यांना विक्री केंद्रावर नोंदणीचे आवाहन केले आहे. नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनाच भात विक्री करता येणार आहे.
हवामानातील बदलाचा परिणाम भात पिकाच्या उत्पादकतेवर होत असून, उत्पादकता खालावू लागली आहे. वाढती मजुरी, बियाणे, खते, इंधन दरवाढ यामुळे भात लागवडीसाठी येणारा खर्च निघत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. हळवे भात कापणी सुरु झाली आहे. गरवे, निमगरवे भात तयार होण्याच्या मार्गावर आहे. मात्र, नोव्हेंबरपर्यंत भात कापणी पूर्ण होऊन डिसेंबरपासून भात खरेदी जिल्ह्यात सुरु होणार आहे. खरेदी केलेल्या भात भरडून तांदूळ रास्त धान्य दुकानात विक्रीसाठी पाठविला जातो.
पावसामुळे तयार भात जमीनदोस्त झाले आहेत, ज्या शेतकऱ्यांनी भात कापले होते तेही भिजले आहेत. भात वाफे पाण्याने तुडुंब भरल्याने कापलेले भात पाण्यावर तरंगत होते. पाऊस असाच सुरू राहिल्यास गवत कुजण्यासह भाताला अंकुर यायला सुरुवात होवू शकते. गतवर्षी भाताला क्विंटलला १८६८ रुपये दर प्राप्त झाला होता. यावर्षी दरात वाढ झाली असून चालू वर्षी २ हजार ४० रुपये दराने भात खरेदी केली जाणार आहे. डिसेंबरपासून भात खरेदीला प्रारंभ होणार आहे.