मुंबई : मुंबईतील वांद्रे-वरळी सी लिंकवर झालेल्या भीषण अपघात प्रकरणी एकाला अटक केली आहे. इरफान अब्दुल रहीम बीलकिया असे आरोपीचे नाव असून त्याच्यावर ओव्हर स्पीडिंग आणि रॅश ड्रायव्हिंगचा आरोप आहे. मुंबई पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला. तर आठ जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. यापैकी काहींची प्रकृती गंभीर आहे.
मुंबईतील वांद्रे-वरळी सी लिंकवर बुधवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास भीषण अपघात झाला. वांद्रेहून वरळीच्या दिशेने जाणा-या मार्गावर पोल नंबर ७६ आणि ७८ जवळ हा अपघात झाला. भरधाव वेगाने येणा-या कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनांना जोरदार धडक दिली. या अपघातात गाड्या एकमेकांवर आदळल्या.
या अपघातात गजराज सिंह, सत्येंद्र फौजदार, राजेंद्र, चेतन कदम आणि अॅम्ब्युलन्स चालक सोमवाथ साळवे यांचा मृत्यू झाला. गजराज, सत्येंद्र, राजेंद्र हे सी लिंकवर सुरक्षारक्षक म्हणून काम करतात.