डॉ. लीना राजवाडे
आधुनिक शास्त्राने विष स्वरूप अन्न हा विषय आहार शास्त्र जसे प्रगत होत गेले तसे समाजापुढे मांडले आहे. Auto immune diseases, जीवनशैलीतील बदल हे या आजाराचे व इतरही अनेक आजाराशी निगडित प्रमुख कारण मानले जात आहे. यात मुख्य मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे, तो म्हणजे आजाराशी लढण्याची क्षमता कमी किंवा अकाली संपताना दिसते आहे. प्रतिकार क्षमता माणसाजवळच नव्हे, तर सर्वच प्राण्यांजवळ, अनेक आजारांशी लढण्याचे नैसर्गिक साधन आहे. प्रतिकार शक्ती ही उत्तम संतुलित आहारानेच मिळू शकते. हे विस्ताराने लिहिण्याचे कारण आज जो विषय आपण पाहणार आहोत, तोही लगेच जरी वाईट परिणाम दाखवत नसला तरी सतत तसे विरुद्ध खाण्याने आरोग्याची हानी होऊ शकते. ती सौम्य नव्हे, तर घातक परिणाम करू शकते. जे दुरुस्त करणे कष्टसाध्य असते.
एव्हाना लक्षात आले असेल की, आजच्या लेखाचा विषय आहे ‘विरुद्ध आहार.’ शरीराला धारण करणारा प्रत्येक धातू, त्याला बिघडवणारा आहार हा विरुद्ध समजावा. शास्त्रात याचे अनेक प्रकार सांगितले आहेत. जे आपण पुढे बघणार आहोत. याने नेमके काय होते, तर सशक्त धातू बनण्यात अडथळा निर्माण होतो. कारण ती गोष्ट tissue metabolism च्या विरुद्ध गुणधर्माची असते. त्यामुळे असे कोणतेही अन्न जे चुकीच्या पद्धतीने, विरुद्ध गुणधर्मांचे पदार्थ एकत्र केल्याने, चुकीच्या पद्धतीने खाल्ल्याने, दिवसा चुकीच्या वेळी, चुकीच्या ऋतूत खाल्ल्याने, या आहाराचा समावेश विरुद्ध आहार संकल्पनेतच केला आहे. विरुद्ध आहार हा सतत सेवन केल्यास दैनंदिन कामात अडथळा येणे इथपासून ते आरोग्यावर घातक परिणाम घडण्यापर्यंत गंभीर परिणाम होऊ शकतात.
रक्त आणि हाडे व हाडांच्या आतली मज्जा यावर हे दृश्य परिणाम दिसून येतात. म्हणूनच ते गंभीर, दुरुस्तीला कठीण असतात. ‘रक्तं जीव इति स्थिती’ हे आपण पाहिले आहे. त्याचबरोबर आयुष्याची अनुवृत्ती, स्वास्थ्य सांभाळणारे महत्त्वाचे धातू म्हणजे आपली हाडे आणि त्यांच्या आतली मज्जा होय. या तीनही धातूंवर विरुद्ध आहाराचा परिणाम होतो. खरं तर सगळ्यात ताकदवान असे हे धातू आहेत, त्यामुळे सुरुवातीलाच दृश्य स्वरूप वाईट परिणाम दिसत नाहीत; परंतु ज्याला slow poisoning or toxic effect म्हणता येईल अशी प्रक्रिया सुरू होते आणि व्याधिक्षमत्व (immunity) कमी होऊ लागले की दृश्य परिणाम दिसतात.
विरुद्ध – आहार प्रकार
वीर्य विरुद्ध (शक्ती असंगतता) – मासे + दूध.
संस्कार विरुद्ध (प्रक्रिया विसंगती) – गरम केलेला मध.
मात्रा विरुद्ध (प्रमाण असंगत) – मध + गाईचे तूप समान प्रमाणात मिसळा.
क्रम विरुद्ध – मध घेतल्यावर गरम पाणी, रात्री दही खाणे
काल विरुद्ध – (वेळ विसंगत) उन्हाळ्यात तिखट पदार्थ आणि हिवाळ्यात थंड पदार्थ.
संयोग विरुद्ध (संयोग विसंगती) – फळ कोशिंबीर किंवा दूध + केळी.
परिहार विरुद्ध (नि रोधक विसंगती) – गरम चहा किंवा कॉफी घेतल्यानंतर लगेच थंड पाणी पिणे.
अन्न एकत्र करणे आणि अन्न सेवन करण्याचे काही मूलभूत नियम खालीलप्रमाणे पाळल्यास उपयोग होऊ शकेल.
दही हे साखर, मध, तूप किंवा आवळा यासोबत खावे.
रात्री दही खाऊ नये. ताक पचनास मदत करते, तर दही पचायला जड असते. जेव्हा पचन क्षमता सर्वात मजबूत असते, तेव्हा जेवणाच्या वेळी ते उत्तम प्रकारे पचले जाऊ शकते. दही आम्लयुक्त असते. यामुळे पित्त आणि कफ वाढतात. कारण, त्यामुळे पोटात खूप उष्णता निर्माण होते. दही जड, पचायला मंद आणि बद्धकोष्ठताही निर्माण करू शकते. कमकुवत पचनशक्ती असलेल्या लोकांनी त्याचे सेवन टाळावे.
माशासोबत दूध घेऊ नये कारण त्यांची क्षमता विसंगत आहे. दूध थंड प्रकृतीचे असते, तर मासे उष्ण प्रकृतीचे असतात. परिणामी दूध आणि मासे यांच्या मिश्रणामुळे रक्त खराब होते आणि वाहिन्यांना अडथळा निर्माण होतो. केळी दूध, दही किंवा ताकासोबत खाऊ नये. कारण, ते अग्नी कमी करू शकते आणि शरीरात अतिरिक्त विषारी पदार्थ तयार करू शकते. या मिश्रणामुळे सर्दी आणि खोकलादेखील होऊ शकतो आणि अॅलर्जी देखील होऊ शकते.
फळांच्या चाटप्रमाणे गोड आणि आंबट फळे कधीही एकत्र करू नयेत. वैयक्तिक फळे अशी आणि वेगळी जेवण म्हणून खावीत. चिकन किंवा मासे दूध, तीळ किंवा अंकुरलेले धान्य एकत्र करू नये. कारण, यामुळे पचनाच्या समस्या उद्भवू शकतात. आंबट फळे दुधासोबत खाऊ नयेत. (शेक्स, स्मूदी, मिल्क शेक, फ्रूट क्रीम).
जेवणादरम्यान किंवा थेट नंतर थंड पेय टाळा. यामुळे पचनाच्या समस्या निर्माण होतात.
मध कधीही शिजवू नका. कारण, शिजवल्यानंतर तो एकसंध नसलेला गोंद बनतो ज्यामुळे वाहिन्या बंद होतात आणि विष तयार होतात. थोडक्यात विरुद्ध आहार टाळल्यास स्वास्थ्य, व्याधिक्षमत्त्व टिकायला उपयोग होऊ शकतो. तेव्हा तो न घेणेच हिताचे.