
कानपूर : उत्तर प्रदेश राज्यातील कानपूरमध्ये भाविकांनी भरलेल्या ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात २५ भाविकांचा जागीच मृत्यू झाला असून २८ जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. कारण जखमी झालेल्यांपैकी काहींची प्रकृती चिंताजनक आहे.
हे भाविक नवरात्री निमित्त उन्नाव येथील चंद्रिका देवीच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन परत येत असतानाच कोरथा गावात वेगात असलेला ट्रक्टर उलटला. ट्रॅक्टर ट्रॉली पाण्याने भरलेल्या शेतात पडली. त्यामुळे ट्रॅक्टरमध्ये अडकलेल्या लोकांचा गुदमरून मृत्यू झाला आहे.
सरकारकडून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे.
दरम्यान पंतप्रधान कार्यालयाकडून याबाबत ट्विट करून दु:ख व्यक्त केले आहे. 'कानपूर येथील ट्रॅक्टर अपघाताच्या बातमीने दु:ख झाले आहे. ज्यांनी आपले प्रियजन गमावले त्यांच्याबद्दल मी माझ्या संवेदना व्यक्त करतो. जखमींसाठी प्रार्थना करण्यासह स्थानिक प्रशासन सर्वतोपरी मदत करत आहोत. पंतप्रधान मदत निधीतून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी २ लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपये दिले जातील, अशी माहिती ट्विटद्वारे देण्यात आली आहे.
https://twitter.com/PMOIndia/status/1576245160723484673