मुंबई : भाजपने सन २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा तसेच राज्यातील आगामी महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली आहे. लोकसभा निवडणुकीत राज्यातील बारामतीवर भाजपने विशेष लक्ष केंद्रीत केले असून, बारामतीमधीलच राष्ट्रवादीच्या आक्रमक मानल्या जात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सातारा जिल्हा महिला आघाडीच्या माजी जिल्हा निरीक्षक डॉ. अर्चना पाटील यांनी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत मुंबईतील पक्ष कार्यालयात जाहीर प्रवेश केला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासाठी हा एक मोठा धक्का मानला जात आहे. यावेळी डॉ. पाटील म्हणाल्या की, भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे. ओबीसींना भाजपने न्याय दिला आहे. महाविकास आघाडी सरकारने ओबीसींचे आरक्षण घालवले परंतु भाजपची सत्ता येताच ओबीसींना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे आरक्षण मिळाले.
डॉ. अर्चना पाटील यांचे इंदापूर तालुक्यातील लासूर्णे गाव आहे. इंदापूर तालुक्यातील लासूर्णेचे घराणे हे बडे प्रस्थ मानले जाते. डॉ. अर्चना पाटील यांचे आजोबा दिनकरराव पाटील यांचा माजी खासदार शंकरराव पाटील यांच्या विरोधात विधानसभेला थोड्या मताने पराभव झाला होता. यापूर्वी पाटील यांनी महादेव जानकर यांच्या रासपचे प्रदेश सचिव म्हणून काम केले आहे. डॉ. पाटील यांची इंदापूर तालुक्यासह बारामती लोकसभा मतदारसंघात ओबीसी समाजाचा आक्रमक चेहरा म्हणून ओळख आहे.
दरम्यान, अर्चना पाटलांनी बारामती लोकसभा मतदारसंघात बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर, भोर, वेल्हा या विधानसभा मतदारसंघामध्ये अनेक गावात दौरे केले आहेत. दोन वर्षांपूर्वी त्यांनी राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी अजित पवार यांनी थेट सातारा जिल्हा निरीक्षकपदी डॉ. अर्चना पाटील यांची नियुक्ती केली होती.