बावनकुळेंचे उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर
मुंबई : उद्धव ठाकरे यांना नैराश्य आल्याची टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. आपण गरीब शेतकऱ्यांच्या पोटी जन्माला आलो, कष्टातून आई-वडिलांनी आपल्याला घडवले, याचा मला अभिमान वाटतो, असे बावनकुळे यांनी म्हटले आहे.
मुंबईत बुधवारी झालेल्या शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या गटप्रमुखांच्या मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बावनकुळे यांच्यावर टीका केली होती. त्याला बावनकुळे यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे.
बावनकुळे यांनी ट्विट करत म्हटले आहे की, ठाकरे कुत्सितपणे माझ्या कुळाचा उल्लेख करतात, माझे आई-वडील शेतकरी आहेत. कष्टातून त्यांनी मला घडवलं, मला संघर्षाचा वारसा आहे. गरीब शेतकऱ्याच्या पोटी जन्माला येणं हा गुन्हा आहे का? असे थेट सवाल बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंना विचारला आहे.
पुढे ते म्हणाले की, माझ्या कुळाचा उद्धार करून ठाकरेंचे नैराश्य दूर होणार असेल, तर तो माझ्या कुळाचा सन्मानच आहे, असे म्हणत बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.
ठाकरे म्हणाले होते की, नालायक माणसं आपण जोपासली. मेहनत शिवसैनिकांनी केली आणि पदे त्यांनी लाटली. त्यांचे कर्तृत्व काय? त्यांनी बाहेरचे उपरे एवढे घेतले की, बावनकुळे की, एकशे बावनकुळे हेच कळत नाही. सध्या गिधाडाची टोळी फिरते आहे. निजामशहा, आदिलशहा आले आणि गेले. त्याच कुळातले अमित शहा. मी गिधाड शब्द मुद्दाम वापरला. मुंबईत संकटात असते, त्यावेळेस ही गिधाडे कुठे असतात. ही जमीन नाही. आमची मातृभूमी आहे. जो आमच्या आईवर वार करायला येईल, त्याचा राजकारणात कोथळा बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही.