Wednesday, March 19, 2025
Homeमहाराष्ट्रठाणेरेल्वेची संरक्षक भिंत कोसळल्याने दोघांचा मृत्यू

रेल्वेची संरक्षक भिंत कोसळल्याने दोघांचा मृत्यू

ठाणे (प्रतिनिधी) : डोंबिवली पश्चिमेकडील सिद्धार्थनगर झोपडपट्टी परिसरात भिंतींच्या दुरुस्तीच्या कामादरम्यान अपघातात दोन कर्मचाऱ्यांना जीव गमवावा लागला असून तिघेजण जखमी झाले आहेत. याठिकाणी असलेल्या रेल्वेच्या नव्या संरक्षक भिंतीचे काम सुरू असतानाच शेजारी खेटून असलेली जुनी संरक्षक भिंत कोसळल्याने दुर्घटनेत त्या ठिकाणी काम करणारे पाच मजूर गंभीर जखमी झाले. यामधील दोन मजुरांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. गंभीर जखमी झालेल्या कामगारांना तातडीने जवळच्या शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

डोंबिवली पश्चिमेकडील सिद्धार्थनगर येथे रेल्वेच्या संरक्षण भिंतीच काम सुरू आहे. बुधवारी (२१ सप्टेंबर) दुपारच्या सुमारास हे काम सुरू असताना या भिंतीला खेटून असलेली जुनी भिंत अचानक कोसळली. या दुर्घटनेत त्याठिकाणी काम करत असलेले पाच मजूर गंभीर जखमी झाले. भिंत अंगावर कोसळल्याने हे मजूर ढिगाऱ्याखाली गाडले गेले होते. स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदत कार्य सुरू केले. अग्निशमन विभागाला याबाबत माहिती देखील देण्यात आली. अग्निशमन विभागाने तत्काळ या ठिकाणी धाव घेतली पोलीस आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने पाचही जणांना जवळच्या शास्त्रीनगर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

रुग्णालयात दाखल केल्यानंतर यामधील गंभीर जखमी झालेल्या मल्लेश चव्हाण आणि बंडू कुवासे या दोन मजुरांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. माणिक पवार, विनायक चौधरी, युवराज वेडगुत्तवार या तीन मजुरांवर शास्त्रीनगर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी जखमींच्या नातेवाईकांचे जबाब नोंदवण्याचा काम सुरू असून कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे डोंबिवलीचे एसीपी सुनील कुऱ्हाडे यांनी सांगितले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -