Friday, March 21, 2025
Homeमहाराष्ट्रकोकण'या' नेत्यांची जीभ घसरतेय

‘या’ नेत्यांची जीभ घसरतेय

रत्नागिरी : बंडखोरीनंतर शिंदे गट आणि शिवसेना नेत्यांमध्ये अगदी पायरी सोडून टीका केल्याचे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. मात्र, रामदास कदम यांनी केलेल्या टीकेनंतर त्याला प्रत्युत्तर देताना शिवसेना नेते भास्कर जाधव यांची जीभ घसरली आहे. रामदास कदमांना वेड्याच्या रुग्णालयात दाखल करायला हवे, अशी टीका भास्कर जाधव यांनी केली आहे.

मुंबईतील शौचालयांमध्ये जेवढी घाण नाही, तेवढी घाण रामदास कदम यांनी ओकली आहे, असे सांगतानाच माझे वडील गेल्यानंतर अनेक नेते मला भेटायला आले. गिते, तटकरे, मुश्रीफ आले. त्यांच्या मी पाया पडलो. रामदास कदम यांच्याही पाया पडलो. त्याचा अर्थ त्यांनी वेगळा काढला. त्यांना काही वैचारिक पातळी आहे की नाही? असा सवालही जाधव यांनी उपस्थित केला आहे. रामदास कदम यांच्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिमा मलिन होत आहे. त्यामुळे शिंदे यांनी त्यांना तात्काळ पदावरून हटवले पाहिजे, अशी मागणी जाधव यांनी केली आहे.

दापोलीत आयोजित केलेल्या सभेत बोलताना रामदास कदमांनी ठाकरे कुटुंबावर वैयक्तिक पातळीवर टीका केली. बाळासाहेबांना वाटत असेल की सोनियांच्या नादी लागून आपला मुलगा बिघडला, असे विधान कदम यांनी केले आहे. तसेच आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरेंच्यावरही कदमांनी निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे हेच खरे गद्दार आहेत, असेही कदम म्हणाले. उद्धव ठाकरेंना आपण बाळासाहेबांचा मुलगा आहोत हे वारंवार का सांगावे लागते, त्यांना संशय आहे की काय, अशा शब्दांत रामदास कदम यांनी टीका केली.

उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना ते कुठेही गेले तरी रश्मी वहिनी त्यांच्यासोबत असायच्याच. माँसाहेब मीनाताई ठाकरे या आयुष्यात कधीही व्यासपीठावर चढल्या नाहीत. तर उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना केवळ तीन वेळा मंत्रालयात गेल्याचेही कदम म्हणाले होते. आदित्य ठाकरे यांच्यापेक्षा भरत गोगावले यांना मंत्रिपद दिले असते. पण वडील मुख्यमंत्री झाल्यावर आदित्य ठाकरे यांना लगेचच कॅबिनेट मंत्री व्हायचे होते. एवढेच कशाला, तर रश्मी ठाकरे यांचाही मंत्रिमंडळात कसा समावेश झाला नाही, याचे मला आश्चर्य वाटते, अशी खोचक टीका रामदास कदम यांनी केली होती.

बाळासाहेब ठाकरे यांनी जे कमावले ते उद्धव ठाकरे यांनी गमावले. दापोलीची सभा स्वर्गीय बाळासाहेब बघत असतील तर उद्धव ठाकरे हे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने बिघडलाय असे म्हणत असतील. उद्धवजी तुम्ही शिवसेना मोठी केली नाही. मातोश्रीवर देखील खोके गेलेत, तोंड उघडायला लावाल तर भुकंप होईल. यांनी एवढे खोके खाल्ले, यांना डायबेटीस कसा होत नाही, असा हल्लाबोल माजी मंत्री रामदास कदम यांनी जाहीर सभेतून केला. यावेळी त्यांनी आदित्य ठाकरेंना देखील चिमटा काढला. आदित्य ठाकरे टुनटुन करत खोके खोके बोलतोय आधी लग्न करून बघ मग संसार काय असतो ते कळेल, त्यावेळी खोके काय ते देखील कळेल.

बाळासाहेबांच्यानंतर मातोश्रीवर एवढे खोके गेलेत, एवढे गेलेत ‘ये अंदर की बात है’ तोड उघडायला लावाल तर भुकंप होईल, यांनी एवढे खोके खाल्ले, यांना डायबेटीस कसा होत नाही, याचे आश्चर्य वाटते आहे, असे ते म्हणाले.

शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव यांनी केलेल्या टीकेचा समाचार घेताना रामदास कदम म्हणाले की, पुढील विधानसभा निवडणुकीत गुहागर मतदारसंघातून भास्कर जाधव निवडून येणार नाहीत यासाठी आपण प्रयत्न करू.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -