त्र्यंबकेश्वर (वार्ताहर) : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरिहर गडावर वाट चुकलेल्या ट्रेकर्सची वनविभाग गिर्यारोहकांच्या टीमने यशस्वीरित्या सुटका करत त्यांना सुखरूप परत आणले.
गेल्या तीन दिवसांपासून नाशिक शहरासह त्र्यंबकेश्वर परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. अशातच मध्यंतरी पर्यटनाला बंदी घातल्यानंतर पर्यटकांचा ओघ कमी झाल्याचे चित्र होते. मात्र पुन्हा एकदा पर्यटकांनी आपला मोर्चा त्र्यंबक परिसरातील पर्यटनस्थळांकडे वळविला. यातच येथील हरिहर गडावर वाट चुकल्याने अडकून पडलेल्या चौघा मित्रांची वनविभाग गिर्यारोहकांच्या टीमने यशस्वीरित्या सुटका केली.
नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरिहरगड येथे मालेगाव येथून पर्यटनासाठी आलेले चार जण उतरताना वाट चुकल्याने अंधारामुळे अडकल्याची घटना रात्री उशिरा घडली. दरम्यान वेळीच संपर्क झाल्याने वनरक्षक, वनमजूर बचाव पथकाने त्यांना रात्री उशिरा गडाखाली सुखरूप उतरवले. रात्रीच्या वेळी गडावर दाट धुके असल्याने हे पर्यटक अडकून पडले होते. मात्र यामुळे पुन्हा एकदा पर्यटकांचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
याच पार्श्वभूमीवर मालेगाव येथून पर्यटनासाठी आलेल्या चार मित्रांना मात्र गडावरून उतरताना वाट सापडली नाही. वाट चुकल्याने ते भरकटले. शेवटी स्थानिक तरुणाच्या ही बाब निदर्शनास आल्यानंतर या चौघांना खाली आणण्यास मदत झाली. यासाठी वनविभाग आणि गिर्यारोहकांनी रेस्क्यू ऑपरेशन राबवित वाट चुकलेल्याना सुखरूप खाली आणले.