राजापूर : राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांना पोलिसांसमोरच जाळून मारण्याची धमकी देण्यात आली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या काल झालेल्या राजापुरातल्या सभेमध्ये ही घटना घडली आहे. रिफायनरीला विरोध करणाऱ्या एका कार्यकर्त्याने नाना पटोले आणि पोलिसांसमोरच ही धमकी दिल्याने एकच खळबळ उडाली आहे.
धमकी दिलेल्या या नेत्याचे नाव जोशी असल्याचे सांगितले जात आहे. त्याने दिलेल्या धमकीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. ही घटना पोलिसांनी गांभीर्याने घेतली आहे. या प्रकरणी रत्नागिरी पोलीस अधिक्षक मोहनकुमार गर्ग यांनी उदय सामंत यांच्याशी याविषयी चर्चा केली आणि पुढील चौकशीची ग्वाही दिली.
रिफायनरी समर्थक आणि विरोधक यांनी राजापुरात नाना पटोले यांची भेट घेतली. यावेळी आपली भूमिका मांडत असताना रिफायनरी विरोधकांचा संताप अनावर झाला. त्यानंतर त्यातल्या जोशी यांनी उदय सामंत यांना जाळून मारण्याची धमकी दिली. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि पोलिसही उपस्थित होते.