मुंबई (प्रतिनिधी) : दहा दिवस लाडक्या गणरायाची मनोभावे सेवा केल्यानंतर अनंत चतुर्दशीला भाविकांनी बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला. विसर्जनस्थळी निर्माल्य कलश ठेवण्यात आले होते. या निर्माल्य कलशात तब्बल ५ लाख ४९ हजार ५१५ किलो निर्माल्य जमा झाले आहे. या निर्माल्यापासून पालिका खत निर्मिती करणार असून पालिकेच्या उद्यानातील झाडांना या खताचा वापर केला जाणार आहे.
दरम्यान ५ लाख ४९ हजार ५१५ किलो निर्माल्यापासून पालिका सेंद्रीय खत तयार करणार आहे. विशेष म्हणजे यामध्ये सर्वाधिक निर्माल्य संकलन हे अनुक्रमे भांडुप (एस विभाग), अंधेरी पश्चिम (के पश्चिम) व बोरिवली पश्चिम (आर मध्य) या विभागांमध्ये झाले आहे. या निर्माल्यापासून सेंद्रीय खत तयार करण्याची कार्यवाही घनकचरा विभागाची आहे. सुमारे ५ लाख ४९ हजार ५१५ इतक्या मोठ्या प्रमाणातील निर्माल्य हे महानगरपालिकेच्या प्रशासकीय विभागांमध्ये असणाऱ्या सेंद्रीय खतनिर्मिती प्रकल्पांमध्ये हलविण्यात आले आहे. आता ह्या निर्माल्यापासून खतनिर्मिती करण्याच्या प्रक्रियेस सुरुवातही झाली आहे.
पुढील साधारणपणे एका महिन्याच्या कालावधीत ह्या सर्व निर्माल्याचे रुपांतर सेंद्रीय खतामध्ये होईल, अशी माहिती मुंबई पालिकेच्या घन कचरा व्यवस्थापन खात्यामार्फत देण्यात आली आहे. तयार होणारे सेंद्रीय खत पालिकेच्या उद्यानांमध्ये असलेल्या झाडांकरिता वापरण्यात येणार आहे.
गणेशोत्सवादरम्यान मुंबई शहर, उपनगरात घरगुती व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी विसर्जित केलेले निर्माल्य गोळा करण्यासाठी ४१९ निर्माल्य कलश पुरविण्यात आले होते. त्याचबरोबर हे निर्माल्य गोळा करून खत निर्मिती प्रकल्पाच्या ठिकाणी वाहून नेण्यासाठी ३८१ वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती. यानुसार सर्व २४ विभागांमधून निर्माल्य गोळा करण्यात आले आहे.
सर्वात जास्त निर्माल्य (विभाग)
एस विभाग – ७७,८२५ किलो
आर मध्य विभाग – ५५,७०० किलो
के पश्चिम विभाग – ५९,५०० किलो
एच पूर्व विभाग – ४६,२८० किलो
सर्वात कमी निर्माल्य (विभाग)
बी विभाग – २५३ किलो
सी विभाग – ९०० किलो
ए विभाग – १,०१० किलो
ई विभाग – १,३५५ किलो