Sunday, January 19, 2025
Homeताज्या घडामोडी१९ जिल्ह्यांत लम्पी रोगाचा प्रादुर्भाव; राज्य ‘नियंत्रित क्षेत्र’ घोषित

१९ जिल्ह्यांत लम्पी रोगाचा प्रादुर्भाव; राज्य ‘नियंत्रित क्षेत्र’ घोषित

औरंगाबाद : राज्यातील १९ जिल्ह्यांमध्ये लम्पी रोगाचा प्रदुर्भाव पाहायला मिळत आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून खबरदारीचे पावले उचलण्यात येत असून, राज्यातील जनावरांचे बाजार पूर्णपणे बंद राहणार आहेत.

जनावरांमधील लम्पी स्कीन आजाराचा वाढता प्रादुर्भाव पाहता त्याचे नियंत्रण करण्यासाठी अधिक प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्‍यक झाले आहे. त्यामुळे आता प्राण्यांमधील संक्रामक व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम, २००९ प्राप्त अधिकारांचा वापर करत राज्य शासनाने या रोगाबाबतीत संपूर्ण राज्य ‘नियंत्रित क्षेत्र’ म्हणून घोषित केले आहे.

लम्पी स्कीन हा जलदगतीने पसरणारा रोग असल्याचे दिसून आले आहे. सर्व राज्यांच्या सीमा तपासणी नाक्यांवर काटेकोर अंमलबजावणी व कार्यवाही करण्यासाठी भारत सरकारने सर्व राज्यांना व संघराज्य क्षेत्रांना सूचना दिलेली आहे.
राज्यपालांच्या आदेशानुसार व त्यांच्या नावाने महाराष्ट्र शासनाचे प्रधान सचिव जगदीश गुप्ता यांनी या विषयी गुरुवारी (ता. ८) अधिसूचना काढली आहे. गुरे व म्हशीच्या मृत्यूस कारणीभूत ठरणारा हा रोग राजस्थान, गुजरात, उत्तराखंड, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, हरियाना, हिमाचल प्रदेश, जम्मू व कश्मीर, अंदमान व निकोबार (संघ राज्य क्षेत्र), पंजाब, आसाम, आंध्र प्रदेश, बिहार, छत्तीसगड, गोवा, झारखंड, कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र, मणिपूर, ओरिसा, तमिळनाडू, तेलंगणा व पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये आधीच पसरला आहे.

जळगाव, नगर, धुळे, अकोला, पुणे, लातूर, औरंगाबाद, बीड, सातारा, बुलडाणा, अमरावती, उस्मानाबाद, कोल्हापूर, सांगली, यवतमाळ, परभणी, सोलापूर, वाशीम व नाशिक आदी १९ जिल्ह्यांत ९ सप्टेंबर अखेर २१८ गावांमध्ये ‘लम्पी स्कीन’चा प्रादुर्भाव दिसून आला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -