नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पाकिस्तानात सध्या पुराने थैमान घातले आहे. यामुळे तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. हजारो नागरिक बेघर झाले आहेत. तसेच शेती पिकांचे देखील मोठे नुकसान झाले आहे. पाकिस्तानला मोठा आर्थिक फटकादेखील बसला आहे. या पुरामुळे पाकिस्तानचे १८ अब्ज डॉलरचे नुकसान झाले आहे. तसेच या पुरामुळे आत्तापर्यंत १ हजार ३२५ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर साडेतीन कोटीहून अधिक नागरिकांना या पुराचा फटका बसला आहे.
पाकिस्तानात आलेल्या महापुरामुळे कापूस, भात आणि अन्य पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. पाण्याचा निचरा योग्य प्रकारे केला नाही तर गव्हाच्या पेरणीसाठी गंभीर समस्या निर्माण होऊ शकते. देशातील बहुतांश भागात कापूस पिक वाया गेले आहे. तसेच आता गव्हाची पेरणीही धोक्यात आली आहे. या पुराचा पाकिस्तानला मोठा आर्थिक फटका बसला आहे. १८ अब्ज डॉलरचे नुकसान झाले आहे. तसेच दरडोई उत्पन्नात देखील मोठी घट होण्याची शक्यता आहे.
गरिबी आणि बेरोजगारीचा दर हा २१.९ टक्क्यांवरुन ३६ टक्क्यांपर्यंत गेला आहे. यामध्ये मोठी वाढ झाली आहे. सरकारने दिलेल्या माहितीनुसार, देशातील जवळपास ११८ जिल्ह्यांमध्ये पूर आला आहे. त्यामुळे ३७ टक्के लोकसंख्येला फटका बसला आहे. देशभरातील लाखो लोकांची घर पाऊस, पूर आणि भूस्खलनामुळे पडली आहेत. पायाभूत सुविधांचे नुकसान झाले आहे.
शेतजमिनीबरोबरच पशुधनाचे देखील मोठे नुकसान झाले आहे. या भीषण पुरामुळे पाकिस्तानमध्ये आतापर्यंत १ हजार ३२५ लोकांचा मृत्यू झाला आहे. देशातील धरणांवर प्रचंड दबाव असल्याने पूर पातळी वाढत आहे. त्यामुळे पुराचा धोका आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यावर्षी सरासरीपेक्षा २४३ टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे.
या पूर स्थितीची पाकिस्तानमध्ये मोठा परिणाम झाला आहे. मोठ्या प्रमाणात वस्तू महाग झाल्या आहेत. महागाईत मोठी वाढ झाली आहे. लोकांच्या म्हणण्यानुसार वांग्याला दीडशे रुपये किलो, कांदा अडीचशे रुपये किलो आणि टोमॅटो शंभर रुपये किलोपर्यंत मिळत आहेत, तर कुठे ३०० रुपये किलोने विकली जात आहेत. प्रत्येक वस्तूचे भाव वाढले आहेत. काही दुकानदारही आपत्तीचा फायदा घेत महागड्या किंमतीत वस्तू विकत असल्याचा आरोपही केला जात आहे.