Friday, March 28, 2025
Homeमहाराष्ट्रठाणेठाणे पूर्व, कोपरी, आनंद नगरची पाणी चिंता दूर होणार

ठाणे पूर्व, कोपरी, आनंद नगरची पाणी चिंता दूर होणार

ठाणे (प्रतिनिधी) : ठाणे शहरातील पाणी समस्या सोडविण्यासाठी मुंबई महापालिकेकडून अतिरिक्त २० द.ल.लि. पाण्याला मंजुरी मिळाली असून त्यापैकी ठाणे पूर्व कोपरी परिसरात सहा एमएलडी जादा पाणी मिळणार आहे. त्यामुळे ठाणे पूर्व, कोपरी आणि आनंद नगर गांधीनगर परिसरातील पाणी चिंता दूर होणार आहे. मात्र मंजुरी मिळवून येथील वाढीव पाणी पुरवठा सुरु झाला नव्हता.

यामध्ये जुन्या आणि नवीन जलवाहीन्यांची जोडणी करण्यात न आल्याने ही समस्या सुटु शकली नव्हती. मात्र आता हे कामही अंतिम टप्यात आल्याने येत्या दोन ते तीन दिवसात कोपरीला वाढीव आणि मुबलक पाणी पुरवठा होईल असा विश्वास महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने व्यक्त केला आहे.

ठाणे पूर्व भागाची लोकसंख्या झपाट्याने वाढत असून, चांगल्या नागरीसुविधा देण्याचे मोठे आव्हान ठाणे महापालिके समोर आहे. कोपरी विभागात पाणी टंचाईची समस्या भेडसावत असल्याचे दिसून येत आहे. सध्याच्या घडीला ठाणे महापालिका क्षेत्रात एकूण ४८५ एमएलडी इतका पाणी पुरवठा होतो. यापैकी ठाणे पूर्व, कोपरी आणि आनंद नगर भागाला मिळून २२ एमएलडी पाणी पुरवठा करण्यात येत असल्याचा दावा पालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे. असे असले तरी, दुसरीकडे कोपरीतील काही भागात अपुरे पाणी मिळत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या.

आनंद नगर, गांधी नगर, केदारेश्वर नगर या भागात पाणी समस्या वाढली होती. हा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी ठाणे महापलिका प्रशासनाने मुंबई पालिकेकडे अतिरिक्त पाणी मिळावे अशी मागणी केली होती. त्यानुसार सहा एमएलडी पाणी हे कोपरी विभागाला मिळाले आहे. मात्र हे वाढीव अद्यापही कोपरीकरांना मिळू शकलेले नाही.

मात्र आता ही समस्या येत्या दोन ते तीन दिवसात सुटणार असल्याचा दावा महापालिकेने केला आहे. काही भागांना कमी दाबाने पाणी पुरवठा होत होता. तो नेमका कशामुळे होत आहे, याची पाहणी नुकतीच करण्यात आली आहे. त्यात जुन्या आणि नवीन जलवाहीन्या जोडणीची कामे अर्धवट असल्याचे निदर्शनास आले असून ती कामे आता पालिकेने हाती घेतली असून येत्या दोन ते तीन दिवसात ही कामे मार्गी लागून पाणी पुरवठा सुरळीत सुरु होईल, असा दावा करण्यात आला आहे.

जुन्या आणि नवीन जलवाहीनी जोडणीची कामे करण्यात न आल्याने काही भागांना कमी दाबाने पाणी पुरवठा होत होता. मात्र आता ती अडचण दूर करण्यात आली आहे. त्यानुसार पुढील दोन ते तीन दिवसात येथील मुबलक पाणी मिळण्यास सुरवात होईल. -विनोद पवार, उपनगर अभियंता, पाणी पुरवठा विभाग, ठामपा

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -