मुंबई : आगामी मुंबई महापालिका निवडणूक ही आपल्यासाठी शेवटची निवडणूक आहे, असे समजून लढा, अशा आवेशपूर्ण शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका निवडणुकीसाठी दंड थोपटले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत भाजपने ‘मिशन मुंबई’ ला सुरुवात केली आहे. त्यांच्या उपस्थितीत भाजपच्या २०० पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी मार्गदर्शन करताना फडणवीस यांनी भाजपकडून आगामी मुंबई महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले.
पुढे त्यांनी म्हटले की, मुंबईत ओरिजनल शिवसेना आमच्यासोबत आली आहे. गणेशोत्सवात सगळीकडे भाजपचाच बोलबाला आहे. या भरवशावर शिवसेना राजकारण करत असते आपण त्यांना मागे टाकू. आपल्या जीवनातील ही शेवटची निवडणूक आहे असे माना आणि अभी नही तो कभी नही असे ठरवा. आता केवळ एकच लक्ष्य-मुंबई महानगरपालिका असल्याचे आवाहन फडणवीसांनी केले.
आपले ‘मिशन मुंबई’ साठी सर्व पदाधिकारी, नगरसेवक भाजपा कार्यकर्त्याचे महत्वाची भूमिका आहे. आता सर्वांनी तयारी जोरदार करायची, असेही फडणवीसांनी म्हटले. वॉर्ड रचना काय होईल, कसा प्रभाग असेल याचा विचार करून चालणार नाही, काम करत रहावे, असेही त्यांनी म्हटले.