विरार (प्रतिनिधी) : विरार पश्चिमेतील उंबरगोठण येथील माणिकपूर अर्बन को.ऑप. क्रेडिट सोसायटीत एकूण ५ कोटींचा घोटाळा झाला असल्याची बाब उघडकीस आली आहे. तत्कालीन संचालक मंडळावरच या आर्थिक अपहाराप्रकरणाची संशयाची सुई वळत असून आर्थिक गुन्हे शाखेच्या रडारवर सध्या सदरची पतसंस्था आली आहे. या गैरव्यवहारप्रकरणी वालीव, माणिकपूर, अर्नाळा, नालासोपारा या पोलीस ठाण्यात एकूण १९ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
प्राप्त माहितीनुसार, माणिकपूर अर्बन को.ऑ. क्रेडिट सोसायटी या पतसंस्थेच्या सन २०११ या तत्कालीन संचालक मंडळाच्या काळात काही ग्राहकांना सदनिका, वाणिज्य गाळे घेण्यासाठी कर्ज देण्यात आली होती. मात्र कर्जधारकांनी सदर सदनिकांवरील, वाणिज्य गाळ्यांवरील कर्जाची परतफेड करण्याऐवजी मालमत्ता परस्पर पतंसंस्थेची फसवणूक करून तिसऱ्या व्यक्तीला विकल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पतसंस्थेत एकूण ५ कोटींचा अपहार झाला असल्याची बाब समोर आली आहे. मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला असताना पतसंस्थेची दिशाभूल व फसवणूक करणाऱ्या कर्जधारकांविरोधात चार पोलीस ठाण्यात एकूण १९ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
दरम्यान, पतसंस्थेत झालेल्या घोटाळ्याशी तत्कालीन संचालक मंडळाचे काही हितसंबंध जोडले गेले आहेत का? असा सवाल उपस्थित होत असून आर्थिक गुन्हे शाखेकडून सदर माणिकपूर अर्बन को. ऑप. क्रेडिट सोसायटीचा तपास करण्यात येणार आहे.