थिरुवअनंतपुरम : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेस आणि कम्युनिस्ट पार्टीवर जोरदार हल्लाबोल केला. काँग्रेस आणि डाव्या पक्षांनी कधीही गरिबांसाठी काम केले नाही. तसेच काँग्रेस भारतातून संपत आहे, अशा शब्दांत शहा यांनी म्हटले आहे.
केरळमधील थिरुवअनंतपुरम इथे भाजपच्या अनुसूचित जाती-जमाती परिषदेत शहा बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपने एससी-एसटी समाजासाठी केलेल्या कामांची माहिती दिली. तसेच काँग्रेस आणि कम्युनिस्ट पार्टीवर टीका करताना त्यांनी केवळ या समाजांचा व्होट बँक म्हणूनच वापर केल्याचा आरोप केला.
शहा म्हणाले, देशातून काँग्रेस संपत चालली आहे, तर जग कम्युनिस्ट पार्टीपासून मुक्त होत आहे. जर केरळला भविष्य असेल, तर ते केवळ भाजपसोबतच आहे. काँग्रेस आणि कम्युनिस्ट पार्टीने कधीही अनुसूचित जमाती आणि गरिबांसाठी काम केले नाही, त्यांनी यांना केवळ व्होट बँक असेच समजले. गेल्या काही दिवसांपासून देशातील प्रत्येक भागांमध्ये अमित शहा यांचे दौरे वाढीस लागले आहे. गृहमंत्री म्हणून सुव्यवस्थेचा आढावा घेताना राज्याराज्यांतील अभ्यास अमित शहा करत आहेत.