मुंबई : मेट्रो ३ च्या पहिल्या ट्रेनची चाचणी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रो ३ च्या पहिल्या ट्रेनला हिरवा कंदील दाखवला. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्या विघ्नहर्त्याचे आगमन होत असून त्याने राज्यावरील विघ्न दूर केली आहेत. मेट्रो प्रकल्पामुळे वातावरणातील प्रदूषण कमी होईलच त्याशिवाय राजकीय प्रदूषणही कमी होणार असल्याचे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला टोला लगावला.
यावेळी बोलतानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, पर्यावरणाचा समतोल राखणे हे सगळ्यांचे काम आहे. या ठिकाणी तीन रस्ते आहेत. जंगलात जाऊन पूर्णपणे वृक्षतोडी झाली नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या प्रकल्पाची स्थगिती आम्ही उठवली आणि काम सुरू केले. लोकांच्या हितासाठी असणारे प्रकल्प पूर्ण करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच मेट्रो प्रकल्पामुळे वायूप्रदूषण कमी होईल, साडे सहा लाख रस्त्यावरील वाहनांची संख्या कमी होईल, सतरा लाख प्रवासी प्रवास करतील. वेळ वाचेल, साडे तीन लाख इंधन कमी होईल, खूप मोठा फायदा आहे. या प्रकल्पामुळे आता राजकीय प्रदूषणसुद्धा बंद झाले आहे. पर्यावरणाचे समतोल राखणे आपले काम आहे. या प्रकल्पातून आपण पर्यावरणाचा असमतोल, ऱ्हास होत आहे, अशाप्रकारे कांगावा केला जातो. मात्र या प्रकल्पाच्या तीनही बाजूने रस्ते आहेत. या प्रकल्पासाठी आपण जंगलात जाऊन झाडे तोडतो असा विषय नाही, हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट, सर्वांच्या परवानगीनंतरच प्रकल्प सुरु केला आहे.
एखादा प्रकल्प चल रहा है, चल रहा है… सरकारी काम सहा महिने थांब, असे काही करायचे नाही आम्हाला. आम्हाला कमी वेळात जास्त काम करायचे आहे. आम्हाला पूर्ण बॅटिंग करण्यासाठी अडीच वर्षच आहेत. त्यामुळे कमी बॉलमध्ये जास्त रन काढायचे आहेत. याआधी सभागृहात एकच तुम्हाला भारी पडत होता, आता एक से भले दो आहे. त्यामुळे आम्ही कुठे राजकारण करणार नाही. लोकांना जे पाहिजे ते देणार आहे. अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर निशाणा साधला.
युतीचे सरकार येऊन २ महिने झाले. दोघांचा शपथविधी, म्हणजे तेव्हा दोघांचा झाला होता. बहुचर्चित अशा मेट्रो चाचणीला हिरवा कंदील दाखवण्याची संधी मिळाली. त्यामुळे मुंबई मेट्रो प्राधिकरण महामंडळाचे अभिनंदन करतो, सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
आपण पाहतोय की तो समृद्धी महामार्ग, संपूर्ण रस्ता पूर्णत्वास जात आहे. लवकरच नागपूर ते शिर्डी उद्धाटन करत आहोत. असे अनेक प्रकल्प सुरु केले. परंतु त्यामध्ये काही विघ्न आले आहेत. उद्या गणरायाचे आगमन आहे. त्याप्रमाणे अश्विनी भिडे यांनी योग साधत मेट्रोला हिरवा झेंडा दाखवला आहे. त्यामुळे आता वाटत नाही की विघ्न येतील. विघ्नहर्त्याने राज्यावरील बरीचशी विघ्न दूर केली आहेत, असेही मुख्यमंत्री म्हणाले.