Thursday, April 24, 2025
Homeमहाराष्ट्रजळगाव जिल्ह्यात ‘बनाना टुरिझम’ संकल्पना राबवणे गरजेचे

जळगाव जिल्ह्यात ‘बनाना टुरिझम’ संकल्पना राबवणे गरजेचे

विजय पाठक

जळगाव : केळी आणि कपाशीसाठी प्रसिध्द असलेल्या जळगाव जिल्ह्यातील केळी ही देशभरात चांगलीच प्रसिद्ध आहेत. आता परदेशात देखील जळगावची केळी निर्यात होवू लागली असून तेथे देखील ती लोकप्रिय आहेत. या केळी पिकामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण झाला. केळी निर्यातीतून जळगावची वेगळी ओळख जगाला झाली. त्याचबरोबर आर्थिक समृध्दी देखील आणली. असे असले तरी जळगाव जिल्ह्यात ‘बनाना टुरिझम’ ही संकल्पना आणण्यात प्रशासन आणि जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी कमी पडले आहेत.

जळगाव जिल्ह्यात ४५ हजार हेक्टरमध्ये केळीची लागवड केली जाते. त्यात रावेर, यावल, चोपडा, मुक्ताईनगर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर केळीचे पिक घेतले जात आहे. राज्यात अन्य जिल्ह्यात देखील केळी पिकत असली तरी या भागातील जमीन, हवामान, पाणी यामुळे अन्य ठिकाणांपेक्षा जळगावची ही केळी अधिक चवदार आहेत. त्यांना विशेष गोडवा असल्याचे एका पाहाणीतील अभ्यासात दिसून आले आहे.

टिश्यूकल्चर तंत्रज्ञानाने यात क्रांती झाली आणि केळीचा कालावधी वीस वरून बारा महिन्यांवर आला. केळीची खोडेही रोगमुक्त झाली. या खोडांना लागलेली केळींची लांबी वाढली, गोलाई वाढली आणि केळीच्या घडाचे वजन देखील दहा किलो वरून तीस किलोवर गेले. सहाजिकच केळी उत्पादकाला अधिक भाव, पैसा मिळू लागला व त्यातून या केळी उत्पादकांचे जीवनमान, राहणीमान उंचावले. सुमारे अडीच ते तीन लाख लोकांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रोजगार या माध्यमातून उपलब्ध होत आहे.

केळींची गुणवत्ता वाढावी यासाठी सतत संशोधन सुरू आहे. जळगावचे जैन इरिगेशन यात अग्रेसर आहे. तेथे सतत होत असलेले संशोधन, अथक परिश्रम, त्यांनी निर्माण केलेली लाखो टिश्यूकल्चर रोपे आज देशभर विकली जात आहेत. त्यामुळे देशभरातील शेतकऱ्यांना केळीची सशक्त रोपे मिळत आहेत. जळगावची केळी ही निर्यात झाली पाहिजेत, ती निर्यातक्षम असली पाहिजेत हे जैन इरिगेशचे संस्थापक अध्यक्ष स्व.पदमश्री भवरलालजी जैन यांचे स्वप्न होते. आता हे स्वप्न सत्यात उतरले आहे. केळीची हाताळणी, त्याचे बांधावरच होणारे पॅकेजिंग याचे कौशल्य आता केळी उत्पादक शेतकऱ्यांना मिळाल्याने ही जळगावची केळी आखाती देश आणि अन्य देशात मोठ्या प्रमाणावर निर्यात होत आहेत. या निर्यातीतून सुमारे तीन हजार कोटी तर देशांतर्गत विक्रीतून अडीच हजार कोटी असे पाच ते साडेपाच हजार कोटीची उलाढाल होते.

रावेर, यावल ,चेापडा, मुक्ताईनगर तालुक्यात सर्वत्र दूरवर केळीच्या बागा, त्यांना लागलेले केळीचे घड पहायला मिळतात. विक्रीस न गेलेल्या केळीच्या घडापासून केळीचे वेफर्स बनवले जातात. या केळी अनेक ठिकाणी हे ताजे वेफर्स
आपल्याला समोर बनवून मिळतात. आज हा केळीला पुरक व्यवसाय निर्माण झाला आहे. केळीच्या खोडापासून तंतू, सेंद्रीय खते बनवली जात आहेत. त्यामुळे केळी पिकाचा पुरेपूर वापर होत असतांना दिसतो.

देशात अनेक ठिकाणी आपण सहलीला जातो. केरळला गेलो तर आपल्याला हमखास चहाच्या मळ्यात नेऊन तिथले मळे दाखवले जातात. चहाच्या त्या पानांपासून नंतर ती पाने वाळवून चहा पावडर कशी केली जाते ते पाहण्यासाठी संबंधीत कारखान्यात नेले जाते. आपणही तेथे कौतुकाने ताजा चहा म्हणून खरेदी करतो. जर चहा कॉफीचे मळे अन्य राज्यात दाखवले जात असतील तर महाराष्ट्रात केळीच्या बागा दाखवण्याचा प्रयोग का होऊ नये? जळगाव जिल्हा हा या करीता आदर्श जिल्हा आहे. ‘बनाना टुरिझम’ ही संकल्पना या जिल्ह्यात राबविता येऊ शकते. कृषी पर्यटना अंतर्गत सहज शक्य आहे.

माजी कृषी मंत्री एकनाथ खडसे यांनी बनाना टुरिझम संकल्पनेचे समर्थन केलेले आहे. ते म्हणतात, केळी अनेक जिल्ह्यात आज होत असली तरी केळींवर होणारे संशोधन, टिश्यूकल्चरची निर्मिती, केळीचे विविध बाय प्रॉडक्टस् हे केवळ जळगाव जिल्हयात दिसून येतात. त्यामुळे याची लोकांना माहिती नाही. त्यामुळे पर्यटनाचे नवे दालन म्हणून याकडे पाहता येणे शक्य आहे. कृषी पर्यटन अंतर्गत या ‘बनाना टुरिझम’ला राज्य सरकार प्रोत्साहन देऊ शकते. तशी देण्याचीआज गरज आहे. दुर्दैवाने कृषी विभाग याबाबत अत्यंत उदासीन आहे.

बनाना टुरिझम ही संकल्पना रूजली पाहिजे असे खासदार रक्षा खडसे यांना देखील वाटते. राज्य सरकारने या विषयाला हात घालावा असे त्या सांगतात. जळगाव पासून ५५ किमीवर अजिंठा लेणी असतांना पर्यटक जळगावला न येता ते औरंगाबादहून येतात. हेच पर्यटक जळगावला आले तर अजिंठा सोबत जळगाव जिल्हयातील अन्य स्थळांना भेटी देता येईल. यात या ‘बनाना टुरिझम’चा समावेश होऊ शकेल. यासाठी दृष्टीकोनाची आवश्यकता आहे. प्रशासन आणि जळगावचे लोकप्रतिनिधी अत्यंत उदासीन असून त्यांनी या विषयाकडे गंभीरपणे पाहण्याची मात्र आज गरज आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -